Thursday 13 March 2014

मामू .......भाग १

मामू .......दोन भागात लिहिले आहे आधी भाग १ वाचावा 


भाग १



परवा खूप वर्षांनी विठी दांडू खेळले -with some invention to the game.............
नारळ फोडायचा होता --बाहेर concrete वर नेहमी फोडते --कोण एवढ्या थंडीत बाहेर जाणार --म्हणून घरात हातोडा घेऊन मेपल वूड फ्लोरवर प्रयोग सुरु होते --काय टनाटन उडतं होता --ज्यांना विठीदांडू खेळायचा असतो पण विठी ढिम्म हलत नाही त्यांनी नारळ घेऊन प्रयोग करावा!
हे वाचल्यावर आशिषची प्रतिक्रिया -काय छान युक्ती सांगितलीस --पुढच्यावेळी नक्की खेळेन.! पण अशा युक्त्या वेळ निघून गेल्यावरच का सुचतात बरे? सगळे लहानपण --कच्चा लिंबू म्हणूनच गेले --नाही म्हणजे त्यात पण प्रोग्रेशन होते. म्हणजे आधी सगळेजन ओरडून सांगायचे की हा कच्चा लिंबू ---त्याचा अर्थ कळून प्रोटेस्ट करायला लागल्यावर मग डोक्यावर हात ठेऊन काहीतरी सिग्नलिंग असायचे ---पण त्यातही आपण कच्चा लिंबू ठरवले जातो हे समजायला असंख्य युगे लागली होती! विठीदाण्डूने सगळ्या स्मृती जाग्या केल्या.
लहानपण खंडाळा ( पारगाव ) आणि पाचगणीला गेले. विठी दांडू, गोट्या, गलोर, डब्बा ऐसपैस हे नेहमीचे खेळ. दर सुट्ट्यांना आम्ही मामुंकडे फलटणला जायचो. मामू फलटणला इरिगेशनमध्ये, त्यामुळे राहायला इरिगेशन कॉलनीमध्ये. जिथे राह्यलो तिथे आजूबाजूला उसाची शेते आणि कॅनल. त्यामुळे उसात लपाछपी आणि कॅनलला जाऊन मासे पकडणे हे सुट्टीतले नेहमीचे उद्योग. मामू म्हणजे अगदी जमदग्नी, घरी असले की सगळे चिडीचूप पण एकदा दहा वाजता सायकलवर बसून ऑफिसला गेले की --मामीचे कोण ऐकतो --पुढच्या दारापाशी कोणीतरी एकाने थांबायचे आणि मामांची सायकल वळल्याचा इशारा द्यायचा की बाकी सगळे मागच्या दाराने धूम. बिचारी मामी ओरडून थकायची--दाद द्यायला कोणी आसपास तर पाहिजे!
अशीच एक सकाळ --त्या दिवशी मामू सायकलवर बसून गेले आणि आम्ही सगळे उसाच्या शेतात. मोठ्ठे दोन उस तोडून मी गुड्डूला हाक मारली ---उस तोडून मग पुढे कॅनलला जाऊन पाण्यात खेळणे किंवा मामीची साडी लंपास करून मासे पकडणे हा नेहमीचा उद्योग! पण गुड्डू, मुन्ना कोणीच दिसेना. मी आपली मोठा पराक्रम केल्याच्या अविर्भावात --सगळ्यांना हाका मारत होते. उसाची पाने बाजूला करत बाहेर आले तर समोरच्या दारातून मामू आत येत होते. काहीतरी विसरले होते घरी ---त्यांची सायकल वळताना मुन्नाने बघितली होती आणि बाकी सगळ्यांना निरोप गेला होता. मामू सायकल उभी करेपर्यंत कोण पुस्तक घेऊन बसले होते तर कोणी मामीला लसून सोलून देत होते. मामुंची एन्ट्री पुढच्या दारातून आणि मी मागच्या----
मामुंचे आणि समोरच्या शेतामालकाचे पाणी सोडण्यावरून नेहमीच बिनसायचे--त्यामुळे त्या शेतात जायचे नाही असे फर्मान मामुंनी आधीच काढले होते. त्यात आज सकाळी कोण --काय काय कामे करणार, काय वाचन करणार हे सकाळच्या नाश्त्याच्यावेळी पुन्हा पाठ करून घेतले होते आणि फक्त अर्ध्या तासामध्ये उसाचे दांडके जसे काडकाड गुडघ्यावर मोडावे तसे --ते फर्मान मोडून - उसाच्या पानांनी चरा- चरा कापलेल्या हातात दोन उस घेऊन गड जिंकल्याच्या जोशात मी मागच्या दारात ..
अगदी खिंडीत गाठलेल्या मावळ्यासारखी मी एकदम भौचक्का---मामू काही बोलायच्या आधी माझी सफाई ----नही मामू वोह गन्ना वहापे खडा था! ( म्हणजे मी तोडला नव्हता--असे म्हणायचे होते)
कान धरून मामुनी मागच्या दारात नेले --आणि अंगुलीनिर्देश करून ---देख सारे गन्ने वहापे खडे है म्हणून दाखवले! त्या दिवशी काय काय शिक्षा झाली --तो भाग वेगळा पण गेली पंचवीस वर्षे --फलटणची आठवण म्हणजे गन्ना खडा था ---अशीच आहे
मामू तसे खूप हौशी ---भरपूर वाचायचे, दिवाळी सुट्टीत सगळे दीपावली अंक घरी असायचे, फटाके, रांगोळ्या, फराळआचे सगळे पदार्थ स्वतः मामीबरोबर बसून करायचे. घरी असले की सगळे शिस्तीत सगळी कामे वेळच्या वेळी करणार ---एकदा बाहेर पडले की बिचारी मामी ---ओरडायची खूप ---आवडता शब्द --उंडगी मेली ( आवडता म्हणण्यापेक्षा --तिला आम्ही दुसरा काही पर्याय ठेवला नव्हता). एकदा शनिवारी सकाळी ती भाकरी करत होती --शनिवार - मामुंचा हाफ डे म्हणून आम्हीही कुठे उंदगायला गेलो नव्हतो ---पण काहीतरी धुडगूस चालू होता. तिने वैतागून हातात लाटणे घेऊन आमच्या मागे धावली ---समोर चटई पडली होती त्यावरून पाय घसरून पडली. दोन महिने पाय प्लास्टर मध्ये होता. नंतर तिने कधीही आमच्या मागे धावायाचा किंवा आम्हाला सुधारायचा प्रयत्न केला नाही.
मामुंचा सगळ्यानी सगळे शिकले पाहिजे -- असा कटाक्ष ( सासुरवास ). सगळ्या गोष्टीत त्यांची शिकवणी ---म्हणजे हस्तक्षेप.. एकदा संध्याकाळी आम्ही सगळे बच्चेकंपनी दोरीवरच्या उड्या खेळत होतो! लाल -हिरवा -पिवळा ....लाल -हिरवा -पिवळा ; माझी मामेबहीण अमिना लहान होती --प्रत्येकवेळा लवकर आउट व्हायची . मामू नुकतेच ऑफिसमधून आले होते --मध्येच सूचना आणि लगोलग प्रात्यक्षिक दिले नाही तर मामू कसले? तैयबच्या हातात दोरीचे एक टोक , माझ्याकडे दुसरे --'बघा आता, म्हणा लाल- हिरवा- पिवळा --असे सांगून त्यांनी दोन उड्या मारल्या असतील ---तिसऱ्या उडीसरशी त्यांची लुंगी खाली---हसायची पण चोरी...... त्यानंतर जेव्हा जेव्हा दोरीवरच्या उड्या खेळलो तेव्हा लाल- हिरवा- पिवळा ---आणि लुंगी --असा तैयबचा आणि माझा नेहमीचा जोक. पण या घटनेतून कौटुंबिक जीवनातील एक महत्वाचा नियम शिकलो ---लहानांची फजिती झाली की सगळ्या खानदानला ती गोष्ट सांगितले जाते --गन्ना खडा था चे लेबल -- पण मोठ्यांच्या बाबतीत अशी सार्वजनिक फजिती झाली की त्याबद्दल जाहीरपणे बोलायचे नाही!
असे माझे मामू --आणि असे त्यांचे असंख्य किस्से ---बऱ्याच वेळा लिहायचा विचार केला --पण नेहमीप्रमाणे राहून गेला .. काल फोनवर मांचा एकदम कापरा आवाज --हमीद मामू गेले! त्यानंतरच्या सुन्न क्षणात आणि ओघळणाऱ्या अश्रुमधून पण असे काही आठवले की मध्येच हसू पण येत होते.
इथल्या बाल कल्याण विभागात काम करताना ज्या अगदी "कॉम्प्लेक्स" केसेस असतात त्यामध्ये दोन गोष्टी आता कायद्याने बंधनकारक ठरवल्या आहेत ---एक ' Family Group Conference" आणि दुसरे "Family Therapy" चा वापर. यामध्ये जवळच्या सगळ्या नातेवाईकांना बोलावून त्यात जे नातेवाईक त्या मुलांना वेळ देऊ शकतील, त्या मुलांच्या गरजा विशेषता भावनिक गरजा भागवू शकतील त्यांना त्या मुलांच्या संगोपनात कसे सामील करता येईल --यावर कोर्ट आम्हाला काम करायला सांगते. या प्रक्रियेमध्ये एका मुलामागे कमीत कमी ६-८ प्रोफेशनल्स ३ ते ९ महिनेपर्यंत काम करतात ---या कामावर नंतर रिसर्च करणारे लोक आणि वेळ काही गणलेला नाही !
या प्रत्येक केसवर काम करताना मला मामुंची आठवण येते --त्यांनी दिलेला वेळ, शिकवलेल्या गोष्टी, लादलेली शिस्त, केलेल्या शिक्षा, घरच्या सगळ्या कामात दामटून लावलेल्या पाळ्या, तालुक्याच्या ठिकाणी आलेली सर्कस किंवा इतर ठिकाणी नेलेल्या सहली ---या सगळ्या गोष्टी " केस प्लान" करताना आठवत असतात. त्याचबरोबर असे प्लान करून खरेच या मुलांना, त्या नातेवाईकांना कितपत आपण एकत्र आणू शकू याचीही गोळाबेरीज चाललेली असते ----आणि मग नेहमीची जाणीव ---आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडवून आणता येतात ...पण ज्या सहज घडतात त्यांची मजा काही औरच असते.........मामू तुमच्यामुळे आमच्या बालपणाला जे विविध रंग मिळाले त्यांना लाल --हिरव्या--पिवळ्या अशा कुठल्याही सूत्रात नाही बांधता येणार आणि ना तर कुठल्या थेरपीत मोलता येणार ...................
एकच खंत ---प्रत्येक वेळी अशी आठवण आली की नेहमी ---पुढच्यावेळी भारतात गेल्यावर दोन दिवस फलटणला जाऊन येईन ---आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याशी होतील ----हा प्लानच राहिला .....


No comments:

Post a Comment

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...