Sunday 20 April 2014

काय घडतंय मुस्लिम जगात? भाग 11 इजिप्त - ऐतिहासिक परिप्रेक्ष्य

इजिप्त - ऐतिहासिक परिप्रेक्ष्य 

गेले दोन वर्षे इजिप्त धुमसतोय. तहरीर चौक आणि तिथे २०१० मध्ये सुरु झालेल्या निदर्शनानी  सगळ्या जगभरात खळबळ माजवली आणि हे लोन इतर अरब राष्ट्रातही पोहोचवले. इजिप्त हा अतिशय पुरातन देश. ख्रिस्तपूर्व काळात पर्शिअन साम्राज्याचा भाग असलेल्या देशात  इसवी सणाच्या  पहिल्या शतकातच  ख्रिश्चन आले, वसले. सातव्या शतकात अरब मुस्लीमांनी आक्रमण करून इथे सत्ता स्थापन केली, तेव्हापासून मुस्लिम बहुल असलेल्या या देशात ख्रिश्चन समाज अल्पसंख्यांक म्हणून राहिला. पुढची सहा शतके इजिप्तमध्ये फातीमीद राजवंशाची राजवट होती. कैरो इथे या राजवंशाच्या  खिलाफतीचे केंद्र होते. कोकेशिअन टोळ्यांमधून  मामलुक म्हणून गुलाम सैनिकांची भरती त्याकाळी होत असे. १२५० साली मामलुकांनी सत्ता हस्तगत करून आपले राज्य वसवले . तेराव्या शतकात अतिशय संपन्न असा समुद्रमार्गे व्यापार मामलुकांनी विकसित केला. चौदाव्या शतकात प्लेग्मुळे इथली जवळपास ४०% टक्के जनता नष्ट झाली. खिळखिळया झालेल्या मामलुकांना १५१७ साली ऑटोमनांनी  जिंकले आणि तेव्हापासून हा ऑटोमन साम्राज्याचा प्रांत म्हणून काही शतके राहिला. परंतु ऑटोमनांचा  अधिकार हा अगदी किरकोळ राहिला. इजिप्तमध्ये नेहमीच स्थानिक अधिकाऱ्यांचे आणि नंतर शासनकर्त्यांचे राज्य राहिले. तसेही ऑटोमन सुलतानाची   एव्हड्या मोठ्या भूभागात एकसंघी कारभार चालवण्याची मनशा नव्हतीच. सुलतानाचे अधिपत्य मानून त्यांना नियमित कर मिळाला कि स्थानिक शासकांवर इतर गोष्टी  ऑटोमनांनी  सोडून दिल्या होत्या. त्यामुळे इजिप्त १५१९ पासून ऑटोमन साम्राज्याचा भाग असला तरी दुसऱ्या महायुद्धापर्यंत स्वतंत्रच होता. मोहम्मद अली ने १८०८ पासून येथे सुधारणांची सुरुवात केली होती. अलीच्या राजवटीत शेती, शिक्षण, कायदा आणि अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल केले. आधीची निर्वाह्शेती जाउन कापसाचे उत्पादन सुरु झाले. युरोपात कापसाची आयात करून आलेल्या संपन्नतेमुळे  आणि महसूलवसुलीतील सुधारांमुळे इजिप्तमध्ये भक्कम शासनव्यवस्था निर्माण केली. विसाव्या शतकात इजिप्त अरब देशातील एक अग्रगण्य देश समजला जाऊ लागला. त्याचे एक कारण सुविकसित शासनव्यवस्था आणि त्या अनुषंगाने येणारी स्थिरता हे होते. 

बाकी अरब देशांच्या तुलनेत इजिप्तचा भूभाग आणि लोकसंख्याही प्रचंड आहे. यामुळेही इजिप्त नेहमीच अरब लोकसंखेत आणि  देशांमध्ये बलवान  समजला जातो. स्थिर आणि विकसित शासनसंस्थेमुळे इजिप्तची प्रजा ही तशी सुसंघटीत, आधुनिक राज्याच्या संकल्पनेस मानणारी अशी आहे. गेल्या दोन्ही शतकात लोकसंख्येत दरवाढही प्रचंड झाली आहे आणि अर्थातच त्या अनुषंगाने अनेक नवीन प्रश्न समोर येत आहेत. वाढत्या लोकसंख्येला जास्तीच्या सेवा सुविधा पुरवणे त्याबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, दरडोई उत्पन्आचे समान वाटप असे अनेक प्रश्न वाढत्या लोकसंख्येशी निगडीत आहेत. अर्थात हा प्रश्न फक्त इजिप्तचाच नाही तर अनेक अरब आणि विकसनशील देशांचाही आहेच. परंतु इजिप्तमधल्या सद्य घडामोडींच्या मागचे  वाढती लोकसंख्या हे एक महत्वाचे कारणही आहे. 

इजिप्त जरी सातव्या शतकापासून मुस्लिमबहुल देश असला तरी तिथे धार्मिक अल्पसंख्यांक  विशेषतः ज्यू आणि ख्रिश्चन नेहमीच स्थायिक होते. एकोणिसाव्या शतकापासून युरोपशी वाढलेल्या व्यावसायिक संबंधांमध्ये या अन्य धर्मीय समाजांची महत्वाची भूमिका होती. मुस्लिम आणि  ऑटोमन साम्राज्यात अल्प्संख्यान्काना संरक्षण जरी असले तरी त्यांना धीम्मीचा दर्जा होता, अनेक बाबतीत समान दर्जा नव्हताच. परंतु १९व्या शतकात सुरु झालेल्या सुधारणांमुळे अनेक नवीन संधी या समाजास उपलब्ध झाल्या आणि त्याचा फायदा घेऊन  शिक्षण, व्यापार उदीम, मिडिया आणि प्रशासकीय सेवांमध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांनी बरीच प्रगती केली.  एकोणीस आणि विसाव्या शतकात युरोपीय देश आणि कंपन्यांबरोबरच्या अनेक व्यवहारात या नवीन वर्गाने मध्यस्ती तर केलीच पण त्याचबरोबर आपल्या वाढलेल्या आर्थिक पतीवर त्यानी समाज आणि राजकारणात ही बरीच मुसंडी मारली. बाराव्या शतकापासून इजिप्तमध्ये आलेल्या गुलामसैनिकांनी आपले संसार थाटले होते. तुर्की, कक्यशिअन आणि कोकेशिअन अशा मध्य आशियातून स्थलांतरित झालेल्या या टोळ्यांचे लष्करी कौशल्य उत्कृष्ट दर्जाचे होतेच आणि त्यात त्यांना ऑटोमन साम्राज्यात मानाचा दर्जाही  होता. त्यामुळे लष्करी वर्गाचे अधिपत्य सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात होतेच. एकोणिसाव्या शतकापर्यंत आंतरजातीय/ धर्मीय विवाह सर्रास होत त्यामुळे या लष्करी आणि व्यावसायिक उच्च वर्गाची मक्तेदारी ही तशी परंपरागत गोष्ट इथे आहे. मोहम्मद अलीच्या कारकिर्दीत इजिप्तच्या बहुतांशी उत्पादक जमिनीचा  तोच मालक होता ! अलीचे वंशज या उच्च वर्गावर त्यांची सत्ता टिकवण्यासाठी अवलंबून होते. मोहम्मद अलीकडे जमिनीच्याबरोबरच कापसाचे उत्पादन, आयातीतून येणारी आवक, त्यावर उभ्या उद्योग्धन्द्यांची अशी सर्वच उत्पादनसाधने आणि उत्पादन यावर मक्तेदारी होती. अली आणि त्याच्या निकटवर्तीयानी मुळच्या कोरडवाहू जमिनीचा जास्तीत जास्त सिंचनाच्या सुविधा वाढवून कायापालट केला. इजिप्तची बहुतांशी लोकसंख्या ही नाईल नदीच्या काठावर वसलेली, बाकी जवळजवळ ६०% प्रदेश हा वाळवंटी आणि ओसाड, त्यामुळे सिंचन आणि शेतितल्या सुधारणा छोट्या आणि एकवटलेल्या जमिनीत करणे सोपे होते. एकोणिसाव्या शतकात एकूण अरब उत्पन्नाच्या २०% उत्पन्नाचा वाटा हा इजिप्त म्हणजेच पर्यायाने मोहम्मद अलीच्या कुटुंबाचा होता. करआकारणी आणि वसुलीही सुलभ होती आणि या एकत्रित  उत्पन्नाचा विनियोग करने एका व्यक्तीच्या हाती असल्यामुळे सोपेही होते, कोणाची आडकाठी नव्हती. अलीने सुधारणा जरूर केल्या पण त्याचा उद्देश त्याची राजवट बळकट करणे हाच होता. या काळात युरोपशी इजिप्तचे आर्थिक संबंध सुधारले, इजिप्त कच्च्या मालाचा पुरवठा करणारा आणि तयार माल विकत घेणारी बाजारपेठ ठरला. या देवाणघेवाणीत साहजिकच नव्या व्यवस्था आणि संस्था उभ्या राहणे आवश्यक ठरल्या. सुएझ कालवा कंपनी हा त्यावेळचा बलाढ्य गुंतवणुकीचे एक उदाहरण. फ्रेन्चानी या कालव्यातून आंतरराष्ट्रीय व्यापारास मिळणारी चालना लक्षात घेऊन हा महत्वकांक्षी प्रकल्प सुरु केला होता. या कंपनीच्या निमित्ताने झालेल्या संपर्क आणि व्यवहारातून इतर सामजिक आणि राजकीय देवाणघेवाणही सुरु झाली होती. १८५९ साली सुरु झालेल्या बांधकाम पुढची दहा वर्षे चालले. त्याकाळी $१०० दशलक्ष इतका खर्च आल. बांधकाम करून पहिली ९९ वर्षे कंपनी हा कालवा चालवेल आणि नंतर तो इजिप्त सरकारला देईल असा करार कंपनी आणि लीच वंशज आणि त्यावेळचा इजिप्तचा शासक सईद पाषा याबरोबर कंपनीने केला होता. ऑटोमन साम्राज्याच्या बाबतीत चर्चा करताना अशा बदलांचे - परकीय भांडवल, उद्योग, व्यक्ती यांचे चढत्या स्वरूपातील हस्तक्षेप - सामाजिक परिणाम आपण पहिले होते. इजिप्तमध्येही या सर्व गोष्टी घडून येताना दिसतात. 

आर्थिक व्यवहारांबरोबरच त्या प्रक्रिएत निर्माण झालेले लवाद मिटवण्यासाठी नवीन न्यायालयांची गरज भासली कारण शरिया न्यायालयांच्या व्याप्तीत हे खटले बसत नव्हते. शरीयावर आधारित न्यायालये ही मुस्लिमेतर व्यक्तींसाठी सोयीची नव्हती कारण तिथले नियम हे मुस्लिमांच्या पक्षात असत.  त्याचबरोबर इतर बाबींसाठीही नव्या कायदेपद्ध्तेची गरज निर्माण झाली होती. ऑटोमन सलतनतीच्या  बरेच आधी इजिप्तने नवीन सुधारणा सुरु केल्या आणि त्यानुरूप फ्रेंच कायदेपद्धतीवर आधारीत नवीन व्यवस्था रुजवल्या होत्या. इजिप्तने फ्रेंच समान कायदा जसा होता तसा अरबी भाषेत लागू केला. हा कायदा राबवण्यासाठी आधीची मिश्र आणि शरीया न्यायालये मोडीत काढून पूर्णपणे नवी न्यायालये स्थापित केली. ऑटोमन साम्राज्यात हा प्रयोग फसला आणि त्यांनी तंझीमातचा प्रयोग करून मजल्ला विकसित केला. परंतु इजिप्तमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला आणि सर्वात पहिला न्यायालयीन  संस्थात्मक ढाचा संपूर्ण देशभर उभारण्यात, रुजवण्यात त्यांना यश आले. संपूर्ण अरब जगात यशस्वी अशी ही पद्धती  इजिप्तची त्याकाळची एक उपलब्धी समजली जाते.  ओटोमान साम्राज्याशी फारकत घेऊन शासन आणि राज्यानिर्मितीच्या कामात याच संस्थात्मक जाळ्यांचा फार फायदा नंतर इजिप्तला होताना दिसतो. 

या नंतरच्या काळात सुएझ कालव्याच्या बांधकामासाठी आणि नंतर घेतलेल्या कर्जांपोटी इजिप्तचे शासक दिवाळखोर होतात आणि १८८० साली त्यांचे सुएझ कालव्यातील सारे शेअर ब्रिटिशांना विकतात. कंपनीबरोबरच फ्रेंच आणि ब्रिटीश आता देशाच्या कारभारवारही पूर्णपणे नियंत्रण आणतात. त्यांनी आकारलेल्या अवास्तव करांमुळे आणि त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे इजिप्त जनमानसात क्षोभ निर्माण होतो आणि इजिप्तच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात इथपासून होते. साधारण १८८०-८५ चा हा काळ. या काळात अनेक ठिकाणी राष्टीय लढे सुरु होताना दिसतात कारण राष्ट्रीयतेची संकल्पनाही इतर गोष्टींबरोबर याकाळात युरोपमधून प्रसारित झालेली दिसते. राष्ट्रीय आंदोलनात मुस्लिमांबरोबर, ख्रिश्चन आणि ज्यूही सामील होताना दिसतात. ओटोमान साम्राज्याशी फारकत घेताना मोठ्या मुस्लिम सल्तनतीतील एक प्रांताधिकारी वेगळा होऊन मुस्लिम व्यवस्था चालू ठेवतो असे त्याचे स्वरूप होते. त्या व्यवस्थेत मुस्लिमेतर समाजांना दुय्यम स्थान होते. परंतु नव्या राष्ट्रीय आंदोलनात हे सर्व समाज एकत्र येताना आणि इजिप्त राष्टासाठी लढताना दिसतात.   राष्ट्रीय आंदोलनान्बरोबरच पँन अरेबियनवादही याच काळात विकसित होताना दिसतो. अरबी भाषा बोलणारे ते सर्व संघटीत झाले पाहिजेत, देश आणि राष्ट्राच्या सीमा या कृत्रिम आहेत आणि अरबी भाषा बोलणारया सर्व समुदायाचे राजकीय संघटन आवश्यक आहे या विचारावर आधारित ही चळवळ इजिप्तमध्ये फोफावली.  नंतरच्या काळातही या अरबी भाषेच्या मुद्द्यवर  इजिप्त राजकीय पुढाकार घेताना दिसतो. इजिप्तमध्ये विकसित मिडिया -संचारमाध्यमे या भाषेच्या प्रश्नी फार उपयोगी पडतात. इजिप्तमध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच सिनेमा, गायन आणि इतर प्रसारमाध्यमातून अरबी भाषेचा प्रसार आणि प्रचार पूर्ण अरबी जगतात झाला. या प्रचारामुळेही  पँन अरेबिक चळवळीत इजिप्त आघाडीवर राहिले. उम्मे कल्थुम ही इजिप्तची गानकोकिळा, हिची तुलना आपल्या लताताई किंवा एल्विसच्या लोकप्रियतेबरोबर करता येईल. जनमानसात हिच्या गाण्यांची मोहिनी अजूनही कायम आहे. ओमर शरीफ हा असाच एक कसलेला नायक, अरेबिक आणि बाहेरच्या जगातही त्याच्या अभिनयासाठी ज्ञात. असे अनेक कलाकार आणि समृद्ध सिनेसृष्टी आणि विकसित प्रसारमाध्यमानी इजिप्त हेच अरबी भाषेचे माहेरघर अन्वयाने इजिप्त म्हणजेच अरब किंवा अरबपणाचे  प्रतिक   असा  ठसा सर्व जगात त्या काळी उमटवला. अशाप्रकारे विकसित आणि प्रस्थापित शासनसंस्था, संपन्न अर्थव्यवस्था, भौगोलिक आणि लोकसंखेच्या निकषावर प्रचंड साधनस्त्रोत असणारे, ओटोमान सम्राटाचे सार्वभौमत्व असले तरी वास्तविकता स्वतंत्र आणि म्हणून अनेक सुधारणा यशस्वीपणे राबवून इजिप्त हे एकोणीस आणि विसाव्या शतकात एक बलाढ्य राष्ट्र, अरब जगताचे नेतृत्व आपल्याकडे खेचणारे सामर्थ्यवान शक्ती म्हणून उदयास आलेले आपण पाहतो. 

पँन अरेबिस्म आणि इजिप्तचे राष्ट्रीय आंदोलन यातला एक समान दुवा म्हणजे पाश्चिमात्य देशांच्या वसाहतवादाविरुध्हचा असंतोष . दोन महायुद्धांच्या काळात याला आणखीनच बढावा मिळाला. इजिप्त वाढत्या असंतोषाचे नेतृत्व करणारे अरब जगातील  प्रमुख राष्ट्र म्हणून गणले जाऊ लागले. १९४८ नंतर पँलेसटाइन मध्ये ज्यू वस्त्या वाढू लागल्या तेव्हा तर या नेतृत्वाला अधिकच मान्यता मिळू लागली. निर्वासित पँलेस्टायीन लोकांच्या प्रश्नाला एकूणच अरब जगतात सहानुभूती आणि त्यांच्या हक्कांसाठी समर्थन दिले जात होते.  पँलेस्टायीनचा प्रश्न, पाश्चात्य देशांची त्याबाबतची भूमिका, बृहत अरब प्रदेशांवर असलेला वसाहतवादी अंमल या सर्व घटकांमुळे पँन अरेबिक चळवळ फोफावली आणि तिचे नेतृत्व इजिप्तकडे गेले. परंतु अरब जगातूनच या नेतृत्वाला आव्हान मिळाले.  सौदी अरेबियाला इजिप्तचे सांस्कृतिक आणि भाषिक वर्चस्व आणि त्याचबरोबर उभरते राजकीय नेतृत्व मान्य नव्हते. इजिप्तच्या नेतृत्वामागे असलेला डाव्या विचारसरणीकडे झुकणारा, धर्मनिरपेक्षता मानणारा क्रांतिकारी विचार हा  सनातनी, धार्मिक आणि उजव्या विचारसरणीच्या सौदीला मान्य होणे शक्य नव्हते आणि इथूनच अरब देशांतल्या शीतयुद्धाची सुरुवात झाली.   संपूर्ण अरब जग एका स्वतंत्र राजकीय छत्राखाली आणण्याचा इजिप्तचा मनसुबा होता. येमेन मध्ये झालेल्या ६२-७० या आठ वर्षाच्या यादवी युद्धात इजिप्त आणि सौदिमधील नेतृत्वासाठीची ही दुफळी स्पष्ट दिसून येते. दक्षिण आणि उत्तर येमेनमध्ये सुरु असलेल्या प्रजासत्ताक राष्ट्रीय गट  आणि धार्मिक आणि वांशिक टोळ्यांचे पारंपारिक नेतृत्व यांच्यातील  संघर्षात इजिप्तने  प्रजासत्ताकवाद्यांना फक्त आर्थिक आणि संस्थात्माकच नाही तर लष्करी मदतही दिली. येमेन हे इजिप्तचे विएतनाम म्हणून या युद्धात  ओळखले जाते. इजिप्तचे लष्करी आणि आर्थिक दृष्ट्या मोठे नुकसान या युद्धात झाले आणि अखेरीस वाटाघाटी होऊन येमेन एकत्र राहिला आणि इजिप्तच्या सैन्याने येमेन मधून माघार घेतली. सौदी आणि येमेनचा वर्षानुवर्षे चाललेला सीमेबाबतच्या चकमकी, ब्रिटनचा दक्षिण येमेनवर असलेले नियंत्रण, सोविएत आणि अमेरिका यातील शीत युध्द आणि येमेन मधील शिया सुन्नी हा संघर्ष हे  ह्या युद्धास अधिक जटील करणारे घटक. महत्वाचा अधोरेखीत करायचा मुद्दा हा कि अरब देशांमध्ये निर्माण झालेल्या लोकतांत्रिक, वसाहतवादी देशांविरुद्ध चाललेला राष्ट्रीयतेचा लढा आणि सुधारणा याविरुध्द उजव्या, कट्टर धार्मिक विचारसरणी आणि त्याला वासाहतिक शक्तींनी घातलेले खतपाणी हा अरब राष्ट्रांच्या रंगमंचावर पुन्हा पुन्हा खेळला जाणारा राजकीय खेळ इथेही स्पष्ट दिसून येतो. 

Friday 18 April 2014

काय घडतंय मुस्लिम जगात ? भाग १०. आंतरराष्ट्रीय पटलावर तुर्कस्तान आणि EU

आंतरराष्ट्रीय पटलावर तुर्कस्तान आणि EU 

केमालने तुर्की राज्याच्या स्थापनेपासून  राज्य आणि समाज पुनर्रचनेवर भर दिला आणि तंतोतंत पाश्चिमात्य देशांच्या विशेषतः पश्चिम युरोपच्या  प्रतिमेत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न केला. गेली ७०-८० वर्षे चालेलेल्या या प्रक्रियेने तुर्की राजकारण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुर्कस्तानची विशिष्ट प्रतिमा आणि स्थान निर्माण केले. दुसऱ्या महायुद्धात तुर्कस्तान तटस्थ राहिला, बलाढ्य  आणि एके कालच्या लष्करी मित्र जर्मनीच्या बरोबर तुर्कस्तानने युद्धात भाग घेतला नाही. महायुध्द संपल्यावर तुर्कस्तानने अमेरिकेच्या भूमिकेला जोरदार पाठींबा दिला. याचवेळी तुर्कस्तानला मार्शल प्लानअंतर्गत मोठी मदत मिळाली आणि यानंतर अमेरिकेच्या धोरणात तुर्कस्तानला पश्चिम युरोपातील  देशांएवढेच तोलाचे स्थान आहे. मार्शल प्लान बरोबरच तुर्कस्तान OECD या औद्योगिकदृष्ट्या  प्रगत देशांच्या गटाचा संस्थापक सदस्य बनला. गेल्या पन्नास वर्षातील केलेल्या आर्थिक प्रगतीमुळे तुर्कस्तानने या गटात आपले स्थान आणि वर्चस्व सिध्द केले आहे. एक ग्रीस वगळता तुर्कस्तानच्या कुठल्याही शेजारी राष्ट्राला या गटात प्रवेश मिळवता आलेला नाही आणि एकही मुस्लिम देश या गटात नाही. तुर्कस्तान १९४९ साली बनलेल्या council ऑफ Europe चा हि संस्थापक सदस्य आहे आणि या सदस्यत्वामुळे तुर्कस्तान हा युरोपीय  मानवी हक्कांचा  जाहीरनामा मान्य करणारा देश आहे. तुर्कस्तानचे मानवी हक्कांबाबतची वर्तणूक जरी फारशी समाधानकारक नसली तरी या जाहीरनाम्यावर सही करून त्यांनी तो सुरुवातीपासून मान्य केला आहे. याचाच अर्थ तुर्कस्तानच्या संविधान आणि इतर कायदे हे या जाहीरनाम्यातील तरतुदींशी सुसंगत असायला हवेत अशी अपेक्षा आहे आणि तुर्कस्तानने हा बदल बऱ्याच अंशी घडवून आणला आहे. तुर्कस्तानच्या शेजारी राष्ट्रांशी तुलना करता तुर्की नागरिकांना त्यांच्या हक्कभंगाच्या केसेस सहजरीत्या आंतरराष्ट्रीय कोर्टात नेता येतात. तुर्कस्तान NATO चा ही NATO स्थापनेच्या काळापासून महत्वाचा आणि वजनदार सदस्य आहे. नाटोच्या सदस्यात्वामुळेही मध्य आशियायी आणि कोकेशस प्रांतातील  देशांना तुर्कस्तान जवळचा वाटतो/ आधार वाटतो. नाटोची अनेक विकासात्मक कामे तुर्कस्तानमार्फत या देशांमध्ये पोचवली जातात. या सर्व देशांशी नाटोचे संस्थात्मक संबंध आहेत कारण  लष्करी समन्वय हा सामाजिक आणि राजकीय समन्वयापेक्षा लवकर साधता येतो. तुर्कस्तान हा एकमेव मुस्लिम देश आहे ज्याने इस्राएलला १९४९ पासून मान्यता दिली होती  आणि २०१० पर्यंत तुर्कस्तान आणि इस्रायेल मध्ये सौहार्दाचे राजकीय,   आर्थिक आणि लष्करी संबंध होते. २०१० साली  गाझा येथे राहतसामग्री घेऊन जाणाऱ्या जहाजावर इस्रायेलने केलेल्या हल्ल्यानंतर तुर्कस्तानने इस्रायेलशी असणारे सर्व लष्करी सहकार्य स्थगित केले आहे, आणि राजनैतिक आणि आर्थिक बाबीतल्या संबंध मर्यादित केले आहेत. तुर्कस्तान पश्चिमी देशांच्या सुरक्षागटातील महत्वाचा भागीदार आहे. यांच्या सर्व लष्करी डावपेच आणि इतर कार्वायान्माध्येही तुर्कस्तानचा समान सहभाग असतो. अफगाणिस्तानात असलेल्या आंतराष्ट्रीय सुरक्षा युतीच्या गटामार्फत केल्या जाणाऱ्या शांती आणि स्थैर्यनिर्मितीच्या प्रक्रियेत तुर्कस्तानने महत्वाची भूमिका निभावली आहे. तुरकी सैनिकांचे मुस्लिम असणे हे अफगाणिस्तानातल्या सैन्य आणि पोलिस दलाला प्रशिक्षित करण्याच्या  युतीच्या प्रयत्नात फार महत्वपूर्ण ठरले आहे. 

पाश्चिमात्य देशांबरोबरच तुर्कस्तानने इतर मुस्लिम जगताशीही चांगले संबंध निर्माण केले आहेत, राखले आहेत. 1969 साली स्थापन झालेल्या इस्लामिक सहकार संघटना ( Organisation of Islamic Cooperation, OIC ) चा तुर्कस्तान संस्थापक आणि सक्रिय  सदस्य आहे. पाश्चिमात्य देश आणि विशेषतः अमेरिका तुर्कस्तानच्या इस्लामी जगाशी असलेल्या संबंधांमुळे आणि इतर क्षेत्रातल्या प्रगतीमुळे इस्लामिक देश आणि इतर देशांमधला तुर्कस्तान हा एक दुवा म्हणून पाहतात. तुर्कस्तानच्या प्रगतीचा, लष्करी सामर्थ्याचा आणि आंतरराष्ट्रीय पटलावर असलेल्या स्थानाचा इस्लामिक देशांशी समन्वय स्थापण्यासाठी उपयोग होऊ शकतो हे अमेरिकेच्या तुर्कस्तानला असलेल्या भक्कम पाठीम्ब्यामागचे  कारण आहे. तुर्कस्तानची आर्थिक, राजकीय, लष्करी आणि सामाजिक प्रगती पाहता विकासाच्या पाश्चिमात्य प्ररुपाचे चालतेबोलते उदाहरण म्हणून आणि हे प्रारूप दुसर्या देशांनी स्वीकारावे यासाठीही अमेरिका आणि युरोपीय देश तुर्कस्तानकडे एक आदर्श देश म्हणून पाहतात. याच कारणांमुळे अमेरिका तुर्कस्तानचा युरोपिअन युनियनमध्ये (EU )  समावेश व्हावा म्हणून सक्रिय पाठींबा देत आहे.  

EU मधला प्रवेश? 

तुर्कस्तानचा EU मधला प्रवेश हे अनेक वर्षापासून भिजत पडलेले घोंगडे आणि अवघड जागचे दुखणे या दोन्ही प्रकारात मोडणारी गोष्ट. भौगोलिक दृष्ट्या तुर्कस्तान हे आशियामध्ये येते, एक छोटा युरोपचा भूभाग सोडला तर.  तुर्कस्तानची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पाळेमुळेही आशियायीच. परंतु तुर्कस्तानचे युरोपशी पहिल्यापासून निकटचे संबंध. हे संबंध बऱ्याचअंशी दोघांना तापदायक असलेले, पण देवाणघेवाण - लष्करी,राजकीय आणि आर्थिक मात्र बराच काल चाललेली. EUमध्ये समावेशासाठी वाटाघाटी बरीच दशके चालू आहेत. थोडे खोलात जाउन हा विषय बघूयात. युरोपिअन कौन्सिलने  २००८ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार कोणत्याही देशाला सदस्य बनवताना Acquis Communautaire च्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. Acquis Communautaire,  म्हणजे युरोपिअन युनिअन च्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींचे पूर्णपणे  पालन करून त्यानुषंगाने येणार बदल देशात घडवून आणणे. एकूण ३५ विभागात नमूद केलेल्या या फारच  विस्तृत आणि किचकट अशा कायदेशीर तरतुदी आहेत ज्यांचा दूरगामी परिणाम तुर्कस्तानच्या अंतर्गत  संरचनेवर होणार आहे.  या तरतुदीबरोबरच १९९३ मध्ये युरोपिअन कौन्सिलने लागू केलेला कोपन्हागेन निकषही तुर्कस्तानला पाळावे लागणार. कोपेन्हागेन निकषानुसार EUमध्ये सामील होणाऱ्या देशांमध्ये लोकशाही, लोकशाही कार्यान्वित करण्यास सक्षमपणे रुजलेला संस्थात्मक ढाचा, मानवी हक्कांचे संरक्षण करणारे कायदे, एकूणच कायद्याचे राज्य, अल्पसंख्यांक समुदायास संरक्षण आणि समान संधी, बाजार आणि खाजगी उद्यमांवर  आधारित अर्थव्यवस्था या गोष्टी आवश्यक आहेत. तुर्कस्तानमध्ये अर्थव्यवस्था आणि अल्पसंख्याकांचे हक्कसंरक्षण याबाबतीत अजूनही विवाद आहेत. जुन्या केमाली विचारसरणीनुसार अजूनही सरकार बर्याच अंशी अर्थव्यवस्थेत ,उत्पाद्न्कार्यात सहभागी आहे. EU च्या निर्मितीमागे एक समान बाजारपेठ जिथे देशांच्या सीमा नाहीत आणि  याचाच अर्थ राज्यांच्या विशेष सवलतीही नाहीत अशी मुक्त बाजरपेठ निर्माण करणे हा आहे. व्यापक बाजारात इतर शक्तिमान घटकांशी स्पर्धा करू शकेल अशाच देशांना EU मध्ये घेण्यात येईल असे धोरण आहे. कौन्सिलच्या मते तुर्कस्तान आणि इतर आशियायी देश अजूनही त्या पातळीवर आपापल्या अर्थव्यवस्था आणू शकलेले नाहीत. हा मुद्दा इतर मध्य आशियायी देशांबद्दल जरी खरा असला तरी तो तुर्कस्तानला मात्र लागू होत नाही कारण एकूण राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न या निकषांवर तुर्कस्तान युरोपीय देशांच्या बरोबर किंवा काही देशांच्या पुढेच आहे. खरी कोंडी ही तुर्कस्तानअंतर्गतच आहे. केमालवादाचे समर्थक, त्या विचारप्रनालीतून निर्माण झालेल्या अवाढव्य संस्था, लष्कर तर आहेच पण शिक्षण, अर्थ, कायदेव्यवस्था ई. आणि यासर्व व्यवस्थांमध्ये काम करणारी, त्यावर समृध्द झालेल्या तीन पिढ्यांचे केमालीझ्ममध्ये गुंतलेले हितसंबंध या सगळ्यांनाच गुंडाळून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचे आव्हान तुर्कस्तानच्या जनतेपुढे आहे. गेले शतकभर ज्या उद्देशाने - युरोपीय देशांसारखी प्रगती व प्रतिमा- या व्यवस्था निर्माण केल्या, जोपासल्या आणि त्याचबरोबर प्रचंड प्रमाणावर सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासला, त्या सर्व प्रयत्नांच्या उलट अशी ही मुक्त बाजारपेठ, देश - राष्ट्र आणि राष्ट्रीयता यांनाछेद देऊन एका संदिग्ध समुदायाचा भाग होणे ही तुर्की जनमानसाला सहजासहजी न पचणारी गोष्ट आहे. युरोपिअन कौन्सिलने या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केल्यावर सभासदत्वाच्या काही अति शिथिल जरूर केल्या आहेत आणि तुर्कस्ताननेही मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने पाऊले टाकली आहेत. खरा प्रश्न आहे लष्कराचा राज्यावर असलेल्या नियंत्रणाचा आणि वास्तविक लोकशाही रुजण्याचा! EUमध्ये समावेश होण्याच्या मुद्द्यामुळे प्रचलित समज आणि व्यवस्था यावर बराच गदारोळ उठला आहे आणि नवीन राजकीय चर्चेस तोंड फुटले आहे हे निर्विवाद. सत्तेवर असलेल्या AKP पक्षाची धोरणेही आर्थिक उदारीकरणालादुजोरा देणारी आहेत. 

परंतु अल्पसंख्य समाजाचे हक्क विशेषतः सांस्कृतिक आणि सहभागाचे हक्क,  इतर भाषा बोलण्याचे, आपापल्या भाषेतून शिक्षण घेण्याचे हक्क अजूनही दुर्लक्षित आहेत. तुर्कस्तानात या मुद्द्यांवरून आणि त्या अनुषंगाने EU सामील होण्याच्या निर्णयाहून बरीच धुमश्चक्री माजली आहे. यातून पुढे आलेल्या सामाजिक ताणतणावांना शासन कशापप्रकारे हाताळते यावर सगळ्यांच्याच नजरा लागून आहेत. आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे EUत सहभागी झाल्यावर होणारे आप्रवासन ( immigration ) पश्चीम युरोपमध्ये आधीच खूप मोठा तुर्की समुदाय स्थलांतरीत झाला आहे. वर्षानुवर्षे जरी हे वेगळ्या देशात राहत असले तरी त्यांची सरमिसळ काही तिथल्या समाजात झाली नाही. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून हा समाज वेगवेगळ्या देशात राहतो.EU त सहभागी झाल्यावर या स्थलांतरास मोठी चालना मिळेल आणि EU च्या इतर भागात याचे सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटणार. बल्गेरिया, रोमानिया इथून झालेल्या मोठ्या स्थलांतरामुळे EU देशात अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेतच. आणि त्याचवेळी इतर भागातून येउन लोक तुर्कस्तानमध्ये स्थायी होऊ शकतील का हा मोठा प्रश्न आहे. तुर्कस्तानमध्ये राष्ट्रीय अस्मितेस गेले शतकभर जोमाने खतपाणी घालून फुलवले आहे. या समाजास तुर्क सोडून दुसर्या कोणासही स्वीकारणे, सहन करणे फार अवघड आहे. तुर्कस्तानच्या राष्ट्र आणि राष्ट्रीय अस्मितानिर्मितीच्या  प्रक्रियेत इतर समुदाय आणि देशांबरोबर निर्माण झालेले प्रश्न कसे हाताळले जातील हाही चिंतेचा विषय आहे. उदा आर्मेनिया आणि ग्रीस या शेजारी देशात निष्कासित केलेले समुदाय आणि त्यावेळी झालेला जनसंहार. तुर्की लष्कर आणि जनतेला या घटनांचे पुनर्लोकन करून त्यांच्याकडून झालेल्या अत्याचाराची कबुली आणि जबाबदारी घेणे ही अगदी अशक्यप्राय गोष्ट आहे. EU त समावेश म्हणजे या देशांबरोबर वेगळे संबंध प्रस्थापित करणे आणि त्यासाठी अस्तित्वात असलेल्या अस्मितेच्या राष्ट्रीयत्वाच्या प्रखर भावनांपासून फारकत घेणे होय. 

तुर्कस्तानची भौगोलिक व्याप्ती ही  EU मधल्या इतर देशांपेक्षा फारच मोठी आहे. इतर EU देशांच्या तुलनेत तुर्कस्तानच्या लोकसंख्यावाढीचा दरही जास्त आहे. साहजिकच तुर्कस्तान जेव्हा EU मध्ये सामावून घेतला जाइल तेव्हा सर्वात प्रबळ लोकसंख्या असलेला हा भाग असणार आणि याचे प्रतिबिंब निवडणुकांमध्ये पडणारच. याचीही धास्ती इतर देशांना आहे.तुर्कस्तानचे राष्ट्रीय आणि दरडोई उत्पन्न जरी गेल्या १५ वर्षात वाढले असले तरी काही युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत ते कमीच आहे आणि वाढ दरात फारच चढउतार आहेत -- तर मोठा, भूभाग, मोठी लोकसंख्या, टोकाचा राष्ट्रवाद, लष्कराचे नियंत्रण आणि सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एक्संघतेची मिथके या घटकांमुळे EU मध्ये तुर्कस्तानचा समावेश लांबला आहे . परंतु या मुद्द्यांबरोबरच तुर्कस्तान हा एक मुस्लिम देश आहे आणि त्यामुळेच त्याच्या EU त सहभागी होण्याच्या प्रक्रियेस विलंब लागतो आहे असे बऱ्याच जाणकारांचे आणि तुर्की जनतेचेही  मानणे आहे. या विचाराचा आणि त्यानुषंगाने इस्लाम हीच ओळख आणि अस्मिता हा विचारही बळावतो आहे. AKP पक्ष जरी स्वतःला Justice  & Democratic पारटी म्हणवत असला तरी त्याची सामाजिक धोरणे हि सनातनी आहेत. या धोरणांचा तुर्कस्तानच्या अंतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय भूमिकांवारही येणाऱ्या काळात प्रभाव असणार आहे आणि कदाचित कडवेपणाने राबवलेली शतकाभराची धर्मनिरपेक्षता भूतकाळची गोष्ट होईल, अशी सध्याची तरी लक्षणे आहेत. 

 तुर्कस्तानात घडणाऱ्या घटनांचा अर्थ या पार्श्वभूमीवर लावणे महत्वाचे आहे. या विषयावर  बरेच साहित्य उपलब्ध ही आहे. तुर्कस्तानवरचा या लेखमालेतला हा शेवटचा लेखांक. यापुढे इजिप्त आणि शेजारच्या अल्जेरिया, मोरोक्को, ट्युनिशिया आणि लिबियाकडे वळूयात. 


काय घडतंय मुस्लिम जगात ? भाग ९ केमालीझम आणि त्याच्या मर्यादा



केमालीझम आणि त्याच्या मर्यादा 


 


 मुस्तफा केमाल आणि केमालीझम, आणि तुर्कस्तानच्या ५० वर्षाच्या इतिहासातील निर्णायक विचारप्रणाली. पश्चिमेत विकसित झालेल्या Positivism -प्रत्यक्षज्ञानवाद या   राजकीय विचारप्रणालीवर केमाल्चे विचार आणि धोरणे आधारित होती. एकोणीसाव्या शतकात ऑगस्ट कोम्ट या विचारवंताने प्रत्यक्षज्ञानवाद विकसित केला. सहा तत्वांवर ही विचारसरणी आधारित आहे : प्रजासत्ताक, जनरंजकवाद, धर्मनिरपेक्षता, सुधारणा, राष्ट्रवाद, शासनवाद ( republicanism, populism, secularism, reformism, nationalism, statism). तुर्कस्तानच्या संदर्भात या विचारप्रणालीचे उपयोजन  थोडे विस्तारात समजून घेउयात. 

प्रजासत्ताकवाद : राजेशाहीचा त्याग करून तुर्कस्तानने लोकतांत्रिक शासनपद्धती अवलंबली . ओटोमान साम्राज्याप्रमुख हा आतापर्यंत  शासनप्रमुख असे, टर्किश विधानसभेने ठराव करून सम्राटाला शासनप्रमुख पदावरून पदच्युत केले. त्याहीपुढे जाउन सम्राटाच्या खलिफा हे पदाच त्यानी नष्ट केले. तुर्कस्तानने घेतलेला हा खूप मोठा निर्णय. उदा.  पोपला पदच्युत करून ते पद आणि त्या पदाबरोबर येणारी व्यवस्था यांना बडतर्फ करणे याच्याशीच या घटनेची तुलना होऊ शकते. ( सुलतान आणि खलिफा हे पद १५१९ पासून एकाच व्यक्तीकडे असे, आणि जरी तो ओटोमान साम्राज्याचा सुलतान असला तरी खलिफा हा समस्त मुस्लिम समाजाचा ( सुन्नी) धार्मिक नेता असे.  या निर्णयाने मुस्लिम समाजात एक पोकळी निर्माण केली. खिलाफत ही संकल्पना आणि त्यावर आधारित व्यवस्था हे मुस्लिम समाजानी राजकारणात आतापर्यंत केंद्रीभूत असलेल्या  घटकाला नाकारून प्रजासत्ताकाची स्थापना हा एक मोठा निर्णय होता. 

जनरंजकवाद - polpulism हा शब्द popularly  फक्त राजकीय प्रतिस्पर्ध्यांची टीका करताना आपण ऐकतो. परंतु राजकीय विचारप्रणालीत याचा अर्थ राज्य आणि समाजव्यवस्थेत असलेले सारे वर्ग, संप्रदाय व लिंगावर आधरित भेदभाव  दूर करून जनता संघटनात्मक पातळीवर एकसमान आहे असे मानणे. शासन आणि जनता एकत्रित येउन राष्ट्र्बांधणीच्या कामात सामुहिकपणे सहभागी होतात. त्यांची उद्दिष्टे आणि मार्ग एकाच असतात असा आहे. केमालच्या तुर्कस्तानात अशी एकसंघता, एकता निर्माण करण्यावर भर दिला. महिलांना सर्वत्र समान संधी, त्यांचा राजकीय प्रक्रियेत समान सहभाग, आधीचा पेहराव सोडून फ्रेंच पेहरावाचा अंगीकार, धर्म आणि संप्रदायावर आधारित वैयक्तिक कायदे रद्द करून स्विस  संहितेवर आधारित समान नागरी कायदा ही केमालने रुजवलेली काही populist धोरणे 

धर्मनिरपेक्षता : शासन आणि धार्मिक संस्था यांची पूर्णपणे फारकत- शासनव्यवस्था ही सर्वांसाठी समान असेल आणि तिथे कुणाही धार्मिक व्यक्ती किंवा नेत्याची लुडबुड नसेल, त्याचबरोबर धार्मिक कार्यात शासन हस्तक्षेप करणार नाही. धर्म आणि शासन याच्यात संघर्ष झालाच तर देशाचे संविधान  आणि कायदा याला सर्वोच्च मानून निवडा केला जाईल असे तत्व केमालाने स्वीकारले.  पाच शतकाच्या धार्मिक शासनव्यवस्थेस डावलून सर्व नागिरकांना समान हक्क देणाऱ्या या तत्वाचा आणि त्यावर आधरित कायदे आणि शासनपद्धती केमालनी स्वीकारली. हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय होता. मुस्लिम जगतात याचे पडसाद उमटलेच आणि केमाल आणि त्याच्या सहकार्यांना विरोधही झाला परंतु या तत्वाच्या कट्टर अंमलबजावनीमुळे तुर्कस्तान आजही इतर मुस्लिम राष्ट्रांच्या तुलनेत आपले वेगळेपण टिकवून आहे.केमालवर आधुनिक फ्रेंच कायद्यांचा प्रभाव होताच आणि धर्मनिरपेक्षतेची संकल्पना
( l aïcité) आणि कायदे त्याने फ्रेंच संहितेतूनच घेतले होते. तुर्कस्तानच्या सरकारने पहिल्यांदा क़ुराअनचे भाषांतर टर्किश भाषेत केले आणि त्याचे वितरण मोठ्या प्रमाणावर जनतेत केले . याआधी कुराण फक्त अरबी भाषेतच असे आणि त्याचा मतितार्थ, शिकवण ही धर्मगुरू लोकांपर्यंत पोहचवत असत. या भाषांतराच्या प्रकल्पात कुराण प्रत्यक्ष लोकांना त्यांच्या भाषेतून वाचता येऊ लागले आणि या मधल्या धर्मपंडित गटावर असलेले त्यांचे धार्मिक अस्तित्व त्यामुळे संपुष्टात आले. यानंतरचा महत्वाचा निर्णय म्हणजे अरबी लिपी न वापरता लाटिन लिपीचा अंगीकार. मुस्लिम जगतात अरबी भाषेला देवभाषेचा दर्जा दिला जातो. त्यामुळे हा निर्णय मुस्लिम जगाशी फारकत घेण्याइतका महत्वपूर्ण होता. मुस्लिम जगात बऱ्याच देशात हा लीपिबाबतचा संघर्ष राष्ट्रवादी आणि इस्लामिक या गटात दिसून येतो. केमालचे शासन धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत आग्रही होतेच आणि त्यांची लोकमान्य शक्तीही मोठी होती. परंतु असे असूनही धर्मनिरपेक्षतेचे हे तत्व स्वीकारायला तुर्कस्तानला १४ वर्षाचा कालवधी लागला. १९२४ च्या घटनेप्रमाणे इस्लाम हा तुर्कस्तानचा राष्ट्रीय धर्म होता. १९२८ साली हे कलम वगळण्यात आले आणि  १९३७ साली laïcité,/ धर्मनिरपेक्षतेच समावेश संविधानात करण्यात आला. 

सुधारणावाद : सामाजिक, राजकीय आणि जेवणाच्या सर्व क्षेत्रात सुधारणा करून आधीनुकतेवर आधारित समाजाची रचना करणे, हा विचार सुधारणामागे होता. या सुधारणा विचार, सामाजिक संस्था, व्यवस्था आणि कायदे यात सातत्याने कराव्या लागतील, फक्त १९२० ते ३० च्या दरम्यानची उद्दिष्टे गाठून पूर्ण विकास होणार नाही अशी दृष्टी त्यामागे होती. सुधाराच्या प्रयात्नातले एक उदाहरण म्हणजे जुने  पेहराव टाकून देणे - तुर्की टोप्या गेल्या, अंगरखे जाउन कोट आले, स्त्रियांच्या चादरी ( अंगभर ओढण्या ) गेल्या. व्यक्तीची स्वताबद्दलची प्रतिमा ही तिच्या पेहरावातून व्यक्त होते त्यामुळे जे जे जुने, मागासलेले त्याचा त्याग करून नित्य नवीन गोष्टींचा अंगीकार हाच लोकांना पुढे घेऊन जाइल असा हा विचार होता. याच विचाराने प्रेरित इराणच्या शहाने इराणमध्ये अशा सुधारणा त्याकाळी लागू केल्या होत्या. आपल्याकडे जसे फेटे, पगड्या सामाजिक आणि धार्मिक स्तर दर्शवण्याकरिता  वापरल्या जायच्या, त्याच धर्तीवर तुर्की समाजात सामाजिक आणि धार्मिक स्तरांवर आधारित पगड्या आणि वेशभूषा असे. 

राष्ट्रवाद : तुर्कस्तानच्या निर्मितीत आणि त्यांनतर प्रत्येक व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातून, सर्व सामाजिक आणि प्रशासकीय व्यवस्थांमध्ये तुर्की राष्ट्रवाद अगदी ओतप्रोत भरलेला दिसतो. ओटोमान साम्राज्यात एकाच वेळी अनेक राष्ट्रीयता, वांशिक आणि भाषिक समूह एकत्र नांदताना दिसतात. तुर्क मात्र १९-२३ च्या स्वातंत्र्यलढ्यापासून एक वेगळी तुर्की अस्मिता निर्माण करायचा प्रयत्न करताना दिसतात. तुर्की इतिहास, भाषा, चालीरीती यावर नव्याने संशोधन केमालप्रणीत शासन सुरु करते. तुर्की स्वतःला भाषिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या वेगळा समाज म्हणून स्थापन करताना दिसतात. खरेतर नव्या आधुनिक समाजाची रचना करताना इतिहासात आपली पाळेमुळे शोधणे आणि त्यावर आपली अस्मिता फुलवणे हे विरोधाभासीच आहे. परंतु  नित्झेने मांडलेल्या usable past  या संकल्पनेत या वागण्याचे स्पष्टीकरण दिसते. बरेचसे समुदाय आणि देश इतिहासाचे सोयीस्कर असे संदर्भ घेऊन आपली दुसऱ्यांपासून वेगळी अशी अस्मिता निर्माण करायचा प्रयत्न करताना दिसतात. केमालच्या तुर्कस्तानातही राष्ट्रवाद जोपासताना वेगळ्या तुर्की अस्मितेची गरज होतीच आणि त्यानी ती तुर्की भाषा, इतिहास, संस्कृती यामध्ये शासनप्रणीत संशोधन करून निर्माण केली. अर्थातच घडलेल्या इतिहासापेक्षा हा शासंननिर्मित इतिहास वेगळा असतोच आनि तो त्या त्या राज्यकर्त्यांच्या धोरणांना साजेसा असा असतो. केमालने धार्मिक अस्मितेवर आधारित राज्याची निर्मिती न करता तुर्की अस्मितेवर आधारित राष्ट्रवादाची स्थापना तुर्कस्तानात केली. 

शासनवाद :  राज्याच्या अर्थव्यवस्थेत शासनाचा सहभाग हा फक्त नियंत्रण किंवा नियामानापुरता न ठेवता शासन उत्पादन प्रक्रियेत सक्रिय भाग घेते. सोविएत किंवा भारतात शासनाची उत्पादनप्रक्रियेत सक्रिय भूमिका नव्वदच्या दशकापर्यंत होती. १९२० पासून शासनाने विविध उद्योग्धन्द्यांची स्थापना केली आणि ते अनेक दशके चालवलेही. शासनव्यवस्थेची  ही  सक्रिय आर्थिक भूमिका म्हणजेच शासनवाद हा विसाव्या शतकात अनेक देशात लोकप्रिय धोरणापैकी एक होते. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंत हे चित्र पालटलेले दिसते आणि सगळीकडेच उदारीकरणाची लाट येउन शासकीय उद्योग्धन्द्यांचे खाजगीकरण झालेले दिसते. टर्किश राजकारणातही हा मोठा बदल गेल्या २० वर्षात दिसून येतो आणि जास्तीत जास्त उद्योगांचे खाजगीकरण हे जुन्या केमालवादी व्यक्तींना न पटणारी अशीच गोष्ट आहे. उदा टर्किश विमानसेवेचे खाजगीकरण. टर्क हवाईल्लोरीची तुलना आपल्या एअर इंडिया च्या आधीच्या प्रतीमेशीच होऊ शकते. परंतु खाजगीकरणानंतर मात्र या हवाईसेवेत खूपच चांगला बदल घडून आलेला दिसतो. केमालच्या या विचारधारा आणि धोरणे यापासून टर्किश राजकारणाने बरीच फारकत गेल्या काही वर्षात घेतेली आहे. AKP पक्षास मिळालेल्या पाठींब्यामागे केमालच्या वरील तत्वांचे बरेचसे खंडन झालेले दिसते. परंतु अजूनही तुर्की राज्यघटना आणि समाजमनात या तत्वांना फार महत्वाचे स्थान आहे. केमालच्या कारकिर्दीत अनेक सफल बदल त्याने घडवून आणले त्यापैकी महत्वाचे म्हणजे : 

१९२२ साली सल्तानातीचे उच्चाटन करून १९२३ साली  प्रजासत्ताकाची स्थापना व त्यवर आधारित शासनव्यवस्था 

१९२४ साली खिलाफतीचे आणि खलिफा पदाचे उच्चाटन आणि सर्व मुस्लिम जगाशी फारकत घेऊन धर्मनिरपेक्ष राज्याची स्थापना. 

१९२३ साली लोसानचा करार  करून तुर्कस्तानच्या सीमा बळकट केल्या, सव्हायच्या तहातील आणि त्याधीही ओटोमान साम्राज्याच्या कालावधीत घातलेल्या जाचक अटी  झुगारून देऊन स्वबळा वर सीमेवरच्या राष्ट्रांबरोबर- रशिया, आर्मेनिया, ग्रीस - स्वतंत्र करार केले. 

१९२४ मध्ये शरीयावर आधारित कायदेपद्धती बंद करून शासनप्रणीत समान कायदयावर आधारित न्यायालये सुरु केली आणि रुजवली. 

१९२५ मध्ये धार्मिक पेहराव, पगड्या इ, तसेच धार्मिक फतवे आणि दरवेश संस्थाने ( lodge ) आणि पद्धती बंद केल्या. त्याचबरोबर इस्लामिक कॅलेंडर बंद करून ग्रेगरियन कॅलेंडर लागू केले. 

१९२६ मध्ये इस्लामिक कायदा रद्द करून आधुनिक दंडविधान कायदा लागू केला. याचवर्षी समान नागरी कायदा, दिवाणी आणि फौजदारी असे नवीन कायदेही  लागू केले.  स्त्रियांना राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत यावा यासाठी अनेक योजना सुरु केल्या गेल्या. 

 १९२८ साली राष्ट्रीय शिक्षण कारिणी स्थापन करून समान शिक्षण पूर्तीसाठी शिक्षणव्यवस्था निर्माणाची प्रक्रिया सुरु केली. याच वर्षी टर्किश भाषा आणि लाटिन लिपी लागू केली 

१९३१ साली राष्ट्रीय इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली गेली 

१९३४ मध्ये कायदा करून नवीन कुटुंबाची नावे - आडनावे घेत येतील अशी व्यवस्था केली. आधीची नावे ही पुरोहितांनी दिलेली व धार्मिक स्थान दर्शवणारी  अशी होती. हा कायदा करतानाचं तुर्की विधानसभेने ठराव करून केमालला अतातुर्क -- राष्ट्रपिता अशे पदवी बहाल केली. 

१९३७ मध्ये बर्याच चर्चेअंती धर्मनिरपेक्ष राज्याची स्थापना हे तत्व संविधानात समावेश करून त्यानुसार राष्ट्र्निर्मितीचे प्रयोग सुरु केले. 


 तुर्कस्तानच्या धर्तीवर अनेक राष्ट्रांनी असे सुधारांचे प्रयोग केले होते परंतु या बहुतांशी राष्ट्रांत प्रतिक्रांती होऊन धार्मिक शक्ती सबळ  झाल्याचे दिसते. तुर्कस्तानमध्ये हे बदल रुजले आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक दूरगामी बदल घडून आले. अगदी शून्यातून स्वबळावर या राष्ट्राची निर्मिती करण्यात केमाल आणि त्याच्या साथीदारांना यश ही मिळाले. आज तुर्कस्तान एक संपन्न आणि स्थिरता असलेला देश म्हणून ज्ञात आहे. परंतु केमालीझमच्या बऱ्याच मर्यादा गेल्या दशकांमध्ये पुढे आल्या आहेत. आर्थिक क्षेत्रातील शासनाचा अनुत्पादक सहभाग, राष्ट्रीयता रुजवनेहेतू  सोयीस्कर इतिहासाची ( मिथकांची  ) निर्मिती, राष्टवादी आणि populist धोरणे राबवताना केलेली एकजिनसी समाजाची कल्पना आणि त्यामुळे अस्तित्वात असलेल्या विविधतेचा मानसिक दृष्ट्या नकार, या महत्वाच्या मर्यादा केमालीझमचा  प्रभाव आणि पकड तुर्कस्तानमध्ये कमी होण्यास कारणीभूत आहेत. परंतु सर्वात महत्वाचा घटक म्हणजे लष्कराचा राजकारणातील प्रभाव आणि नियंत्रण. स्वातंत्र्यलढ्यातील लष्कराच्या निर्णायक भूमिकेमुळेच आजचा तुर्कस्तान भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या उदयास आला. त्यामुळे लष्कर आणि लष्करी अधिकारी यांना मानाचे स्थान तुर्की राजकारण आणि जनमानसात आहे. या लष्कराने केमालची धोरणे रुजवण्यात आणि अमलात आणण्यात मोलाची भूमिका निभावली. परंतु त्याच बरोबर केमालच्या विरुद्ध किंवा पर्यायी विचारांना तितक्याच ताकदीने चिरडलेही. त्यामुळे राजकीय लोकशाही रुजण्यात मर्यादा आल्या. १९६० साली लष्कराने त्यावेळच्या सरकारला पद्चुय्त करून सरकार ताब्यात घेतले तेव्हापासून येणाऱ्या सगळ्या सरकारांवर लष्कराची करडी नजर असते. १९७१ साली पुन्हा लष्कर सरकारचा ताबा घेते आणि पुढचे दोन वर्षे मार्शल लौ लागू करते. १९८० सालचे लश्करि बंडात बराच रक्तपात होऊन अनेक लोक पश्चिम युरोपात शरणार्थी म्हणून स्थलांतरित होतात. पुढचे तीन वर्षे लश्कराचे राज्य चालते. १९९७ आणि २००७ साली मात्र लष्करी अधिकारी शासनास त्यांच्या मागण्यांचे अधिपात्र देतात आणि त्यांना अभिप्रेत असलेले बदल जर घडवून आणले नाहीत तर सरकारचा ताबा घेण्याची तंबी देतात. लष्कराची ताकद आणि आतापर्यंतचा उठावाचा इतिहास बघून सरकार अर्थातच त्यांच्या मागण्या मान्य करते. लष्कराचा हा हस्तक्षेप हा तुर्कस्तान युरोप ( E U ) मध्ये सामील होण्यातला सर्वात मोठा अडसर आहे. परंतु गेल्या काही वर्षात हे चित्र पालटताना दिसते आहे. २०१० ते १२ दरम्यान तुर्कस्तानमध्ये २००३ मध्ये आयोजित उठावात लष्करी अधिकाऱ्यांच्या आततायी भूमिकेबाबत खटले भरले होते. हा उठाव काही प्रत्यक्षात झाला नाही पण गुप्तपणे त्याच्या तयारीत हे अत्याचार झाले होते. या खटल्यात अनेक लष्करी  उच्च अधिकाऱ्यांना दोषी ठरवून शिक्षाही झाल्या. नागरी शक्तींच्या  राजकारणातील वाढत्या प्रभावाचे हे लक्षण आहे.  आंतरराष्ट्रीय पातळीवर तुर्कस्तान एक प्रबळ राष्ट्र म्हणून गणला जात असला तरी युरोपिअन युनिअन मध्ये आजही तुर्कस्तानच्या समावेशाला घेऊन अनेक विवाद आहेत. पुढच्या भागात याच्या कारणांची चिकित्सा केली आहे. 
.

काय घडतंय मुस्लिम जगात ? भाग ८ आधुनिक तुर्कस्तानची निर्मिती आणि मुस्तफा केमालचे नेतृत्व




आधुनिक तुर्कस्तानची निर्मिती आणि मुस्तफा केमालचे नेतृत्व 


ओटोमान साम्राज्य लयास जाउन आधुनिक तुर्कस्तानचा उदय आपण या सदरात पाहणार आहोत. मुस्तफा केमाल आणि आधुनिक तुर्कस्तान एकमेकांशी अगदी घट्ट जुळलेल्या आहेत. केमालची  कारकीर्द आणि यश समजावून घेतांना विसाव्या शतकातील या कालच्या एका महत्वाच्या घटकाकडे पाहूयात. दक्षिण गोलार्धातील अनेक देश आणि त्यातील नेते यामध्येही असे अगदी हिरो असल्यासारखे त्या त्या नेत्यांचे स्थान आणि कार्य पाहिले जाते. या सर्व नेत्यांनी पाश्चिमात्य देशांकडून देशाला स्वातंत्र्य मिळवून देवून देशाचा विकास केला, नवी घडी बसवली आणि म्हणूनच तिथल्या जनमानसात त्यांची प्रतिमा ही अगदी अतुलनीय अशा नायकाच्या जागी आहे उदा. इजिप्तचे गमाल नासेर. क्युबाचे चे गवेरा आणि फिडेल केस्ट्रो, घानाचे क्वामे न्कुमा किंवा भारताचे नेहरू- गांधी. या सर्वांच्या  भोवती एक प्रकारचे अदभूततेचे वलय त्यांच्या समर्थकांनी निर्माण केलेले दिसते. त्या त्या देशांच्या राष्ट्रीय अस्मिता या नेत्यांशी जोड्लेल्या दिसतात. या देशांचे इतिहासही या नायकांना केंद्रीभूत ठेऊन लिहिलेले आहेत. या नायकांकडे  सुपरह्युमन गुण असून राष्ट्रबांधणीतील त्यांची भूमिकेबद्दल खूपशी  मिथके पसरलेली किंवा त्यांच्या समर्थकांनी पसरवलेली दिसतात. या नेत्यांच्या भूमिका या बहुतांशी त्यांच्या देशांच्या नीती आणि कार्यक्रमात तंतोतंत प्रतिबिंबित झालेल्या दिसतात.  अगदी हेच नायकपूजेचे ( Hero warship ) रसायन केमाल आणि तुर्कस्तानच्या निर्मितीत दिसते. केमालचा उदय हा ओटोमान साम्राज्यांने आपली लष्करी आणि प्रशासकीय वाढ व्हावी यादृष्टीने केलेल्या प्रयत्नाच्या कालावधीतील आहे. 

लष्करी सुधारात ओटोमान साम्राज्याने सुरुवातीला फ्रांस आणि ब्रिटनचे सहाय्य घेतले. परंतु १९व्या शतकाच्या सुरुवातीपासून ओटोमान साम्राज्याने प्रशिया आणि जर्मनीकडून लष्करी प्रशिक्षण आणि सामुग्री घेणे सुरु केले. जर्मनी आणि ओटोमान साम्राज्याच्या ब्रिटन, फ्रांस किंवा रशिया प्रमाणे  समान सीमा नव्हत्या.  जर्मनीची  ब्रिटन, फ्रांस व रशियाशी साम्राज्य विस्ताराबाबत चढाओढ होतीच. १८७०- ७१ साली जर्मन साम्राज्य विस्तारून युरोपमधील महासत्ता म्हणून पुढे येत होते. १८८२ पासून ओटोमान साम्राज्याच्या प्रशिक्षणाची पूर्ण जबाबदारी आणि लश्कराचे  नेतृत्व जर्मन अधिकार्यांकडे होते. याच काळात आधी उल्लेखलेले इतर सुधार - दळणवळण, पोस्ट, तार वगैरे सुरु झाले होते. परंतु पहिल्या बाल्कन युद्धातील पराभवामुळे हे प्रयत्न आणखी सखोल करण्याची निकड ओटोमानांना भासली आणि १९१३ साली लिमन फोन स्यंडर्सं च्या नेतृत्वाखाली ओटोमान लष्करात आणिक कडक बदल सुरु करण्यात आले. पहिल्या महायुद्धास तोंड फुटण्याच्या अगदी काही महिन्यापूर्वी ओटोमान साम्राज्यास जास्तीत जास्त कुमक जर्मनांनी दिली आणि याचवेळी स्यंडर्संकडे सर्व लष्करी अधिकार एकवटले होते. पहिल्या महायुद्धात जर्मनीस एका बाजूला रशिया तर दुसऱ्या बाजूस फ्रांस व ब्रिटन अशा दोन बलाढ्य सेनाना तोंड द्यावे लागले. Flanders प्रांतात ब्रिटन आणि फ्रांसच्या पायदलाची  जर्मन सैन्याने  कोंडी केली आणि त्याचवेळेला बाल्टिक समुद्रातून येणारी रशियाची कुमक थांबवली. दोस्त सैन्याला आपली कुमक पाठवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधणे भाग होते. Dardanelles व  the Bosphorus  या भूमाध्यासमुद्रातून जाणाऱ्या  सामुद्र्धुन्या,  आंतराष्ट्रीय समुद्र व्यापारच्या दृष्टीनी महत्वाचे मार्ग ओतोमानांच्या कब्जात होते.  खालील नकाशात दाखवलेले हे अतिशय चिंचोळे परंतु त्या परिस्थितीत अतिशय महत्वाचे, अशा या मार्गावर ताबा मिळवण्यासाठी  दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांनी गालीपोली या बंदरावर हल्ला चढवला. 


 



गालीपोलीचा स्थानिक सेनापती हा केमाल मुस्तफा होता, त्याने शर्थीने दोस्त राष्ट्रांचा मुकाबला केला.  या द्वीपकल्पावर  समुद्रमार्गे कब्जा  मिळवणे दोस्त राष्ट्रांना शक्य झाले नाही.  त्यांनी जमिनिमार्गे  हल्ले चढवणे सुरु केले. ओटोमान साम्राज्याच्या सार्वभौमत्वासाठी हा लढा फार महत्वाचा होत. 

स्यंडर्सच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या केमालने गालीपोली वाचवण्यासाठी दिलेल्या लढ्यात दोस्तराष्ट्रांच्या  सैन्याने माघार घेतली. या लढ्यात लाखो धारातीर्थी पडले, २५०,००० च्या वर जखमी झाले, दोस्तांना याचा फटका बसलाच परंतु न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या सैनिकांसाठी आतापर्यन्तची ही सर्वात मोठी लढाई ठरली. आणि या घटकेपर्यंत एक स्थानिक पातळीवरचा सेनापती म्हणून माहित असलेल्या केमालला अधिक प्रशस्ती आणि प्रसिद्धीही प्राप्त झाली. 



ओटोमान साम्राज्याचे विघटन 

१९१२- १३ पासून सुरु झालेली साम्राज्याच्या विघटनाची प्रक्रिया पहिल्या महायुद्धात आणि त्यानंतरच्या वर्साय आणि सव्हायच्या तहांतर्गत पूर्णत्वास जाते. पहिल्या महायुद्धादरम्यान अरब प्रांतांमध्ये उठाव होतो. या विषयावर लौरेन्स ऑफ अरेबिया हा, थोडा ब्रिटीशांच्या दृष्टीकोनातून चितारलेला, पण त्याकाळची परिस्थिती दर्शवणारा चांगला चित्रपट आहे. महायुद्धात जर्मनी आणो ओटोमान साम्राज्याचा पराभव होतो. आधीपासूनच दबा धरून बसलेल्या सीमेवरच्या राष्ट्राना  ओटोमान प्रांत गिळंकृत करण्याची संधीच या निमित्ताने मिळते. सव्हायच्या शांती तहात १९२० साली दोस्त राष्ट्र आणो ओटोमान सम्राटाचे प्रतिनिधी नव्या नकाशावर शिक्कमोर्तब करतात. खालील नकाशावरून १९१९ साली झालेल्या या विभागणीची आणि विघटीत प्रांतांची कल्पना येईल. तुर्कस्तानच्या सीमाही याच वेळी अधोरेखित झाल्या असल्या तरी १९२३ पर्यंत चाललेल्या राष्ट्रीय युद्धां मध्येच त्या निश्चित झाल्या. 

  


Inline image 1नकाशात  दाखवल्याप्रमाणे ग्रीसने  तुर्कस्तानच्या डावीकडचा भाग आपल्या सीमांना जोडून घेतला. पूर्वेकडे अर्मेनिया प्रजासत्ताक उदयास आले तर व्हान तळ्याकाठी व दक्षिणेला अन्तोलिआने मोठा भूभाग ताब्यात घेतला. त्याच्यापलीकडे   कुर्डांच्या राज्यासाठीची जागा आरक्षित करण्यात आली. जोपर्यंत कुर्डीश राज्य स्थापन होत नाही तोपर्यंत तो भूभाग ब्रिटन आणि फ्रान्सच्या अधिपत्याखाली आला.  त्याचप्रमाणे सिरीया आणि इराक हे हि ब्रिटन आणि फ्रान्सचे सुरक्षित शासनविभाग म्हणून निर्मित  झाले. परंतु त्याचवेळी हे सुरक्षित प्रदेश आंतराष्ट्रीय प्रभावाखाली आणले गेले. त्यामुळे या प्रदेशांवर इटालीयान आणि फ्रेंच आंतरराष्ट्रीय शासनाचाही अधिकार आला. भूमध्य आणि काळ्या समुद्राला जोडणाऱ्या दोन्ही समुद्र्धुनीचेही आंतरराष्ट्रीयीकरण करण्यात आले. सव्हायच्या तहातील अटींबाबत लोकांमध्ये असंतोष होताच. त्यात १९१९ मध्ये ग्रीसने ओटोमान साम्राज्याच्या काही भागांवर आक्रमण केले, ग्रीसला ब्रिटन आणि फ्रांसने मदत केली.  आणि इथूनच तुर्कांचा राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा सुरु झाला तो १९२२ पर्यंत  या सत्ताविरुद्ध विजय मिळेपर्यंत चालू राहिला. लष्करी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील या लढ्यात तुर्कस्तानने सव्हायच्या तहातील अटी झुगारून सीमेवरच्या रशिया, अर्मेनिया, फ्रांस आणि ब्रिटनशी सीमानिश्चीतीकारिता स्वतंत्र करार केले. लोसान येथील करारात सध्याच्या सीमा निश्चित झाल्या फक्त सामुद्र्धुनीवर ब्रिटनचा हक्क  १९३६ पर्यंत चालू राहिला, नंतर तुर्कांनी तोही ताब्यात घेतला. तुर्की स्वातंत्र्याचा लढा हा तुर्की अस्मितेचा अविभाज्य भाग बनला कारण पहिल्या महायुद्धानंतर पराभवग्रस्त आणि पारतंत्र्यात गेलेल्या देशाला बलाढ्य शत्रूंच्या तावडीतून स्वतंत्र करून सार्वभौमत्व या लढ्याने दिले, आजच्या तुर्कस्तानची भौगोलिक  आणि राजकीय ओळख जगाच्या नकाशावर करून दिली. 

परंतु त्याचबरोबर या अस्मितेच्या राजकारणात ओटोमान साम्राज्यात एकत्र राहणाऱ्या विविध समुदायांमध्ये असलेला एकोपा व सहजीवन संपुष्टात आले. लोसानच्या तहानंतर फक्त तुर्की वांशिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारे लोक तुर्कस्तानात राहतील असे निश्चित करण्यात आले. दिढ लाखाच्यावर ग्रीक लोकांना तुर्की भागातून निष्कासित करण्यात आले तर ग्रीकमध्ये दोन हजार वर्षांपासून  राहणाऱ्या लाख तुर्कांना सध्याच्या तुर्कस्तानात यावे लागले. फाळणीचा अनुभव घेतलेल्या कुठल्याही देशास या अनुभवातली दाहकता आणि या दरम्यान  घडणाऱ्या आपदांची कल्पना येईल. अर्मेनिया येथून येणारे तुर्क आणि नवीन तुर्कस्तानातून जाणारे अर्मेनियन लोक यांच्या नरसंहारातूनच आजचा एकसंघ तुर्कस्तान निर्माण झाला. परंतु राष्ट्रीय लढा, असामान्य नेतृत्व आणि परिश्रमाने मिळालेले स्वातंत्र्य या समीकरणात तेव्हा इतर अर्मेनियन, ग्रीक, कुर्द या लोकांवरचे अत्याचार मात्र समाजमानसात सोयीने विसरले गेले. केमालच्या नेतृत्वाखाली नवीन तुर्कस्तानची निर्मिती करताना या स्वातंत्र्यलढ्याला केंद्रीभूत असणे हे साहजिक होते. परंतु त्याननंतर शासनव्यवस्थेमार्फत निर्मित आणि रचित अशा तुर्की एकसंघ समाजाचे एक मिथक निर्माण करण्यात आले आहे. नित्शे या तत्व्वेत्त्याने usable past  ही संकल्पना मंडळी आहे. तुर्की अस्मिता निर्मितीत एकसंघ, एकजिनसी समाजाच्या कल्पनेत हजारो वर्षे एकत्र राहिलेल्या या सभ्यतांना जागा नाही.  केमालच्या राष्ट्र्निर्मितीतला सर्वात कमजोर दुवा हा या पारंपारिक विविधतेचा नकार हाच आहे.  परंतु त्याचबरोबर केमाल पाशाने अंगीकारलेली धोरणे आणि त्याचे लोकप्रिय नेतृत्व याच्या जोरावरच तुर्कस्तान एक प्रबळ राष्ट्र म्हणून पुढे आले आहे. कमालची धोरणे, तत्वे याबरोबरच केमालीझ्मच्या मर्यादा यावर पुढच्या लेखात चर्चा  केली आहे. 

काय घडतंय मुस्लिम जगात ? भाग ७ ऑटोमन सुधारणा - तंझीमात

ऑटोमन सुधारणा - तंझीमात 


ऑटोमन साम्राज्य हे कधीच पूर्णपणे  एकसंघ नव्हते. त्यांच्या प्रजेमध्ये वांशिक, भाषिक आणि प्रांतिक विविधतेबरोबरच धार्मिक विविधताही जोपासली होती. परंतु याचे मुख्य कारण ऑटोमन  शासनकर्त्यांना आपल्या सीमा रुंदावण्यात जास्त रस होता, त्या विस्तारवादी टोळ्या होत्या, प्रशासन किंवा राज्यघडी  स्थापण्यात त्यांना ना तर रस होता आणि ना त्यासाठी लागणारे ज्ञान आणि कुशलता. त्यांनी स्थानिक प्रजेचे जबरदस्तीने धर्मांतरण केले नाही कारण ते करण्यासाठीची आणि नंतर सांभाळण्यासाठीची यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती. यात त्यांची सहिष्णू वृत्ती दिसते असा काही अभ्यासक दावा करतात पण त्यात फारसे तथ्य नाही कारण इस्लामच्या शिकवणूकीप्रमाणे ज्यू आणि ख्रिश्चन धर्मियांना अगदी बरोबरीचे स्थान समाजजीवनात मिळते. या दोन्ही धर्मात  अमूर्त एकेश्वरवाद आणि एक धर्मग्रंथ या समान बाबी असल्यामुळे त्या धर्मियांचे समाज आणि राजकारणात बरोबरीचे स्थान समजले जाते. या कारणास्तव आणि बऱ्याचशा स्थानिक समुदायाच्या चाली रिती चालवण्यासाठी स्थानिक व्यवस्था अबाधित राखण्यातच ऑटोमनना स्वारस्य होते. याचे मुख्य कारण म्हणजे ख्रिश्चन आणि ज्यू धर्मीय आधीपासून प्रशासकीय कामांमध्ये निपुण होते आणि ऑटोमन सुलतानीत त्यांना महसूल जमा करण्याच्या कामात तसेच सामवून घेतले होते. जोपर्यंत  सुलतानाला महसूल मिळत होता तोपर्यंत या समुदायांच्या अंतर्गत बाबीत सुलतानाला/ राज्याला काही भूमिका नव्हती. मुस्लिम धर्मियांमध्येही स्थानिक पातळीवर काझी न्यायालये चालत असत परंतु राज्याप्रणीत केंद्रवर्ती अशी व्यवस्था मात्र तेव्हा अस्तित्वात नव्हती. वेगवेगळे समुदाय एकाचवेळेस एकत्र पण आपल्या आपल्या पद्धतीने जगत होते याला मिल्लत - समुदाय व्यवस्था असे नाव होते.  या व्यवस्थेत मुस्लिम धर्मियांना निश्चितच प्राथमिकता दिली जायची आणि काही प्रमाणात सक्तीने धर्मांतर झालेही असेल परंतु स्थानिक प्रशासन आणि नियमनात ऑटोमन साम्राज्याची एकसंघी भूमिका नव्हती. इतर धर्मियांना,'धिम्मी' हा दर्जा होता. त्यांच्यावर अतिरिक्त कर लावून मुस्लिमेतर प्रजेच्या संरक्षणाचा करार या धिम्मी दर्जामध्ये केला जात असे. जिझिया हा या कराचाच भाग - आपल्याकडे पुरंदरे इत्यादींच्या अभिनिवेशी नाटकामुळे याबद्दल माहिती आहेच. परंतु ऑटोमन  साम्राज्यात मात्र मुस्लिमेतर जनतेने धिम्मिचा दर्जा व जिझिया सारखे कर आनंदाने स्वीकारले होते. कारण त्यांना कोणालातरी त्यांच्या संरक्षणासाठी असे कर द्यावेच लागत - कॉन्सटटिनोपालला  द्या किंवा ओतोमानाना द्या - एवढाच काय तो फरक. इस्लाममध्ये धिम्मि बाबतचे नियम फार स्पष्ट आहेत आणि मोहम्मदच्या कारकिर्दॆत त्यांचे याबाबतीतला व्यवहार हा ऑटोमन शासाकांसाठी आदर्श होता, त्यामुळे स्थानिक जनतेला यात जास्त सुरक्षितताही वाटत असे. मिल्लततचे काम स्थानिक पातळीवरचे काझी चालवत आणि त्यांचे शिक्षणही स्थानिक पातळीवर असे. राज्याची यात फार काही भूमिका नव्हती आणि एकसंघ असा काही कायदाही त्याबाबत नव्हता. त्या काळापासूनच इस्लामिक कायदा म्हणजे काय याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत.  एक केंद्रीभूत असा कायदा मात्र नाही. असा कायदा विकसित आणि प्रशासित न करता येणे हि खिलाफत आणि अगदी आतापर्यंतच्या इस्लामिक शासनातील  एक मोठी त्रुटी आहे. एकोणीसाव्या शतकात जेव्हा ओटोमान साम्राज्याने असा एकसंघ कायदा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे वेगवेगळे मिल्लत त्याविरुद्ध बंड  करून उभे राहिले. यात इस्लामेतर धर्मियांच्या मिल्लतना विशेषतः ख्रिश्चन धर्मीय मिल्लताना युरोपीय  देशांचा पाठींबा मिळाला व नंतरच्या काळात ओटोमान साम्राज्याचे विघटनातही या मिल्लतनी महत्वाची भूमिका बजावली. काय होत्या या सुधारणा आणि त्यातून काय निष्पन्न झाले पाहूयात . 

१८३० पासून सुरु असलेल्या या लष्करी धुमश्चक्रीत लष्कराबरोबरच प्रशासकीय आणि कायदेविषयक सुधारणा अपरिहार्य ठरल्या होत्या. १८३० पासून सुरु झालेला तन्झीमात -ए- हयरीये; (फायदेमंद सुधारणा/ पुनर्रचनेचा) काळ जवळजवळ १९०८ पर्यंत गणला जातो. यात अनेक बदल आले तरी तें प्रमुख घटना आहेत आणि या घटनांच्या तिथीही महत्वाच्या आहेत. पहिली तारीख ३ नोव्हेंबर १८३९, गुल्हान येथिल राजप्रासादातून ओटोमान साम्राज्याबांधाणी साठी अन्वीन संस्था निर्माण करण्याचे  फर्मान लागू केले. यानुसार मध्यवर्ती बँकेची, लष्करी महाविद्यालयाची, लष्करी वैद्यकीय प्रशिक्षण संस्थेची, पोस्ट ऑफिस आणि इतर दलान्वाल्न व्यवस्थांची निर्मिती करण्याची सुरुवात झाली. 

१८ फेब्रुवारी १८५६ मध्ये लागे केलेल्या, ' हात हुमायून इस्लाहात फर्मानी' नुसार सर्व ओटोमान प्रज्साठी समान कायदा, समान नागरिकत्व  आणि वैयक्तिक कायद्यावर आधारित व्यवस्थांचे उच्चाटन करण्याचे फर्मान लागू केले. हा खूप मोठा बदल होता आणि अर्थातच त्याबरोबर अनेक समस्याही पुढे आल्या. सर्वांना समान लेखणारी, समान संधी उपलब्ध करून देणारी, मुस्लिम आणि मुस्लिमेतर यांच्यात ओटोमान साम्राज्याच्या वेळी असणारे भेदभाव नष्ट करून सर्वांना प्रशासकीय आणि कायदेशीर बाबीत सामवून घेणारे कायदे करण्याचे हे फर्मान होते. तिसरे महत्वाचे फर्मान २३ डिसेंबर १८७६ साली आलेले कानून- एसासी, ही ओटोमान राज्याची लिखित राज्यघटना. या सुधारांनी जनजीवन ढवळून काढले आणि भविष्यातील प्रगत तुर्कस्तानचा  पाया घातला. 

या सुधारांची व्याप्ती मात्र मर्यादित राहिली किंवा त्या वेळेस या सुधारणा त्यांचे अंतिम उद्दिष्ट काही गाठू शकल्या नाहीत. याची महत्वाची कारणे म्हणजे प्रथमतः या सुधारणा अगदी वरच्या टोकाच्या प्रशासकीय अधिकार्यांनी आणि शासकांनी बाह्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी म्हणून सुचवल्या होत्या. जनसामान्यांना बदल हवा म्हणून विकसित झालेले हे बदल नव्हते. त्यामुळे त्यांना पाठींबा आणि राबवण्यासाठी सुपीक असे जनमानस अस्तित्वात नव्हते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे शासनाने दोन प्रमुख गोष्टींचा ताबा आपल्या हातात या सुधारणांद्वारे घेऊ पहिला. त्या बाबी म्हणजे  शिक्षण आणि दुसरे समुदायाबाबतचे अंतर्गत कायदेकानून. हा फक्त तोंड देखल्या पुनर्रचनेचा प्रयोग नव्हता तर यामुळे प्रस्थापित शिक्षण आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच्या यंत्रणावर हा ताबा होता. शिक्षण आणि कायदे त्याकाळी धर्माधिष्ठित असल्यामुळे त्यांच्या प्रसारणाचे कामही धर्मिक व्यक्तींकडे होते. अस्मितेबरोबरच हा त्यांच्या रोजगाराचाही प्रश्न होताच आणि त्यामुळेच या सुधारणांना बराच विरोध धार्मिक गटांकडून झाला. 

तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तिथल्या इतर धर्मियांच्या हक्काचा मुद्दा. याप्रश्नी जरी इतर धर्मियांना ओटोमान साम्राज्याने सुधारणा अंतर्गत समान स्थान दिले तरी त्यांच्या  धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांच्या चळवळीना इतर युरोपीय देश खतपाणी घालताच होते.  त्याचबरोबर आधी उल्लेखल्या प्रमाणे ओटोमान साम्राज्यास फार धक्का न लावण्याचे त्यांचे धोरण होते. म्हणजेच सुधारणांना पाठींबा पण अगदी आपले हितसंबंध राखन्यापुरताच  - अशी दुहेरी भूमिका या बाह्य शक्तींची होती. ज्या शक्तींवर ओटोमान साम्राज्याची सुधारानासाठी भिस्त होती त्या फक्त आपापले हितसंबंध जोपासण्यापुरतेच समर्थन या सुधारवादी प्रयत्नांना देत होते. बहुतेक सुधार हे लष्करी आव्हानांना दिलेला शेवटच्या क्षणाचा प्रतिसाद असेच सुरु झाले होते. उदा १८३९ चे  पहिले फर्मान हे इजिप्तला सिरीयातून हुसकून लावताना घेतलेल्या युरोपिअन समर्थनाच्या बदल्यात होते. १८५६ चे दुसरे फर्मान क्रिमिअन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपिअन देशांनी त्यांच्या देशातील प्रजेचे समर्थन मिळावे या प्रयत्नात केलेल्या समझौत्याचा भाग होते. १८७६ चे राज्यघटनेचे फर्मान ही  तुर्क आणि रशिया यांच्या १८७०-७७-८० च्या युद्धात तुर्कस्तानला युरोपियन राष्ट्रांनी दिलेल्या पाठिंब्याचे आपापल्या देशात समर्थन व्हावे सुकर व्हावे या प्रयत्नाचा भाग होते. 

तंझीमातच्या प्रयत्नांमुळे  एक परिणाम असा झाला कि जे ओटोमान साम्राज्य आतापर्यंत लोकांच्या दैनदिन जीवनापासून दूर होते, त्या साम्राज्याचा - राज्यव्यवस्थेचा लोकांच्या आयुष्यात सहभाग वाढला. आतापर्यंत स्वायत्तपणे आपला कारभार चालवणाऱ्या मिल्लत ना हा हस्तक्षेप  खुपणे साहजिकच होते. याच दरम्यान युरोपमध्ये राष्ट्रवादी चळवळीन्चा प्रभाव वाढत होता. ओटोमान साम्राज्याच्या पंजातून सुटण्यासाठी आणि स्वतःच्या मिल्लतची वेगळी ओळख राखण्याच्या धडपडीत बऱ्याच गटांना   राष्ट्रवादी विचारांची आणि अभिरुपाची मदत झाली. बाल्कन देशांचे ओटोमान साम्राज्यातून निघणे, अरब प्रांत स्वतंत्र होणे आणि इजिप्त आणि पूर्वेचे प्रांत स्वायत्त राहणे या घडामोडी याच काळात घडल्या. राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव आणि बाह्य मदत हे जरी घटक याकामी पूरक ठरले असले तरी जेव्हा जेव्हा पारंपारिक समाजात राज्यसंस्थेचा  हस्तक्षेप वाढतो तेव्हा तेव्हा असे अस्मितेच्या नावाखाली वेगवेगळ्या गटांचे विभाजन होते . हे बरयाच  ठिकाणी आजही घडताना दिसते. 

लष्करी आणि इतर सेवांची बांधणी करताना बराचसा युरोपिअन व्यापारी वर्ग ओटोमान साम्राज्यात वसला होता.  व्यापारासंबंधी निर्माण झालेल्या तंटे निवारण्यासाठी मिश्र कोर्ट अस्तित्वात आली होती . या कोर्टात न्यायाधीश युरोपिअन असत आणि वादी -प्रतिवादी वकील हे स्थानिक असत. हे खटले चालवणे सुकर व्हावे म्हणून फ्रेंच व्यावसायिक कायद्याचे भाषांतर करून तो कानुमनामे -ए- तीकारात या नावाने १८५० सालपासून लागू करून  या कोर्टात वापरला जाऊ लागला. परंतु ही न्यायालये वाढत्या खटल्यांना सामावून घेण्यात अपुरी पडू लागली. त्यावेळी अस्तित्वात असणारी मुस्लिम न्यायालये युरोपिअन लोकांच्या प्रती भेदभाव करणारी होती. कारण यात फक्त मुस्लिम धार्मिक कायदा आणि पद्धतींचा वापर करून निवाडा केला जाइ. मुस्लीमेतर व्यक्तींना प्रतिनिधित्वचा हक्क या न्यायालयात नव्हता. त्यामुळे सर्व नागरिकांना लागू पडेल असा समान नागरी कायदा निर्माण करावा अशी मागणी पुढे आली. हा कायदा राज्यप्रणीत व प्रशासित न्यायालयांमधून लागू केला जाणे अपेक्षित होते. इजिप्तने असा कायदा केला होता. त्याचेच अनुकरण ओटोमाननी करायचे ठरवले. इजिप्तने फ्रेंचांचा नागरी कायदा आहे तसा भाषांतरीत करून लागू केला होता. परंतु ओटोमान साम्राज्यातून प्रचलित धार्मिक व  कायदेव्यवस्थेतून  याला प्रचंड विरोध झाला. त्यामुळे भाषांताराचे काम अर्धवट सोडून ओतोमानानी इस्लामच्या हनफी परंपरेवर आधारीत व्यावसायिक कायद्याचे सम्हीताकरण सुरु केले आणि त्यातच मुस्लिम समाजातल्या इतर हनाबली, शाफी आणि मलिकी पद्धतींचाही गोषवारा सामील केला. हा 'मजेल्ला' कायदा इस्लामिक जगातला पहिला संहिताकरण ( codification ) केलेला पहिला सार्वजनिक कायदा. १८६९ ते १८७६ पर्यंत हे काम चालू होते. एकूण १६ पुस्तक्कात १८५१ अनुछेदात संहिताबद्ध करण्यात आलेला हा एक प्रचंड मोठा प्रयोग होता. या कायद्याची अंमलबजावणी राज्यव्यवस्थेमार्फत स्थापलेल्या कोर्टातून पूर्ण ओटोमान साम्राज्यात केली जाऊ लागली. अशा प्रकारे इस्लामिक कायदा - सर्व मुस्लिम आणि मुस्लिमेतर जनतेला लागू करण्याचा हा पहिला प्रयत्न. परंतु यातून कौटुंबिक आणि वारसाहक्कसंबंधी तरतुदी वगळल्या होत्या. त्या त्या समाजाच्या धार्मिक कायद्यांनुसार कौटुंबिक बाबींचे नियमन सुरूच राहिले. ओटोमान साम्राज्य संपुष्टात आल्यावरही हा मजेल्ला  अनेक देशात लागू होता उदा तुर्कस्तानमध्ये १९२६ पर्यंत, यानंतर समान नागरी कायदा लागू झाला. परंतु अल्बेनिया येथे १९२८, लेबनॉनमध्ये १०३२, सिरीयामध्ये १९४९, इराकमध्ये १९५३, सायप्रसमध्ये १९६० आणि इस्त्रायेलमध्ये १९८४ पर्यंत ही कायदेपद्धती अस्तित्वात होती. त्याचबरोबर कुवेत, जोर्डन, आणि प्यलेस्टाईन इथेही थोड्याफार फरकाने हा कायदा लागू होता. अशाप्रकारे आजच्या बृहतमुस्लिम समाजव्यवस्थांवर ओटोमान साम्राज्यातील सुधारांचा आणि मजेल्लाचा  प्रभाव निश्चित आहे. 


ऑटोमन साम्राज्य आणि तंझीमातचे संदर्भ  तुर्कस्तानसंदर्भातील पुढील लेखात येणार आहेतच. केमाल पाशा ने अवलंबलेल्या सुधारणा आणि संपूर्णपणे  पश्चिम युरोपीय देशांचे अनुकरण आणि त्यावर आधारीत कायदे पद्धती यामागे तंझीमात च्या मर्यादित यशाची चिकित्सा  करून त्याहून वेगळी सर्वंकष सुधाराची भूमिका होती. 

काय घडतंय मुस्लिम जगात ? भाग ६ ऑटोमन साम्राज्याचा थोडक्यात इतिहास

ऑटोमन साम्राज्याचा थोडक्यात इतिहास  

१२९९ मध्ये सेल्जूक टोळीतून फुटून एक टर्किश टोळी बाहेर पडली आणि इथपासून ऑटोमन  साम्राज्याचा उदय झाला. अन्तोलीया या प्रांतातल्या पूर्वभागात वसलेल्या या टोळीचे कॉन्सटन्टीनोपाल (पूर्व रोम) येथून  चालणाऱ्या त्या भागातल्या बायझानटाइन साम्राज्याशी खूपवेळा कलह आणि लढाया होत. १३०२ पासून सुरु झालेल्या या लढाया १४५३ पर्यंत अविरत चालू रहिल्या. १४५३ मध्ये बायझानटाइन साम्राज्याचा बिमोड करून या तुर्कांनी  कॉन्सटन्टीनोपाल जिंकले व त्याचे इस्तंबूल असे नामकरण करून तेथे आपली राजधानी स्थापन केली. ओटोमान साम्राज्याचा विस्तार खालील नकाशात दाखवल्याप्रमाणे पूर्व, मध्य युरोप ते अगदी कला समुद्र आणि क्रीमिया पर्यंत होता. विएन्ना काबीज करण्याचा ओटोमान सुलतानाने १५२९ आणि १६८३ असा दोनदा प्रयत्न केला, परंतु ते सध्या झाले नाही. यानंतर ओटोमनांनी आपला मोर्चा पूर्वेकडे वळवला. सद्यकाळच्या इराण येथे तेव्हा असणारी सफाविद राजवट आणि  नैऋत्येकडे असणारी अब्बसीद खलिफत यांच्याशी ओटोमनांचा संघर्ष होऊन १५१७ मध्ये अब्बसीद राजवटीचा पाडाव झाला. ओटोमान साम्राज्यात या विजयास फार महत्व आहे कारण प्रेषित मोहम्मदांनी घालून दिलेल्या राज्यव्यवस्थेतील खिलाफत ही संस्था १५१९ साली ओटोमान सुलतानाने आपल्याकडे घेतली. खिलाफतीचे काय झाले हे थोडे नंतर बघुयात.  खालील नकाशात ऑटोमन  साम्राज्याच्या विस्ताराच्या चढ उतारानुसार बदलणाऱ्या सीमा दाखवल्या आहेत.






 ऑटोमन साम्राज्य सुलेमान या सम्राटाच्या कारकिर्दीत अगदी कळसास पोहोचले होते. Suleiman the Magnificent किंवा Suleiman the Lawgiver या नावाने हा जगास ज्ञात आहे. १४९४ ते १५६६ हा याचा जीवनकाळ. आजही अमेरिकन पार्लमेंटमध्ये  जगातील उत्कृष्ट अशा २० कायदेपंडीतांच्या श्रेणीत याचे नाव आणि तैलचित्र आहे. सुलेमान हा ज्ञानोपासक आणि कलांचा पोशिंदा होत. त्याच्या कारकिर्दीत दक्षिण, पूर्व आणि उत्तरेत बाल्कन प्रदेशापर्यंत ऑटोमन  साम्राज्य स्थिरावले होते. पश्चिम युरोपवर ओतोमानांची नजर होती. कायदेविषयक सुधारांची सुरुवात याच काळात झाली. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस ऑटोमन बलाढ्य  पश्चिम  युरोपीय देशांच्या बरोबरीने  गणले जात असे. ओतोमानांच्या सामर्थ्यवान विस्तारामागे त्यांचे बलाढ्य आणि सुसंघटीत लष्कर होते.  दोन शतकात त्यांनी लष्कराची - नौदळ आणि भूदळ, शस्त्रास्त्रे, प्रशिक्षण, संघटना बांधणी अशा सर्वच पातळीवर प्रगती केली होती. ओतोमानांची लष्करबांधणी फारच अनोखी होती. गुलाम सैनिकांचे ( Jannisaries / mamluk )  लष्कर ही खरेतर अब्बसीद खिलाफतीतून पुढे आलेली पद्धत, ओतोमानानी ती जोपासली आणि विकसित केली. १३३० ते १८२६ पर्यंत पाचशे वर्षे यांची लष्करबांधणी याच धर्तीवर होत राहिली. युरोपीय आणि आफ्रिकी देश यांच्यातील गुलामगिरी पद्धत आणि ही पद्धत यात मात्र काहीही संबंध नाही. उलट गुलाम सैन्यातूनच वेगवेगळ्या प्रांतात नेते आणि सुलतानही निवडण्यात येत असत, उदा इजिप्त. सामाजिक अभिसरणाच्या आणि गतिशीलतेच्या सर्व संधी या गुलाम सैनिकांना होत्या. 


 

 चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी लहानवयात जानिसरी म्हणून प्रशिक्षित करण्यासाठी लहान मुलांना सुलतानाकडे आणले जाई. सुरुवातीच्या काळात या मुलांची खरेदीविक्री होत असे आणि बहुतेक मुले हे मुस्लिमेतर - ख्रिश्चन -समाजातील असत. नंतर जानिसारींचे राजकीय आणि लष्करी महत्व वाढल्यामुळे बरेचसे पालक त्यांना स्वखुशीने पाठवू लागले. या मुलांना मांलौस - सुलतानची मालमत्ता समजले जाई. यांची निवडप्रक्रिया फारच कठीण असे.  निवडीनंतर त्यांना राजधानीत असणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात भरती केले जात असे. इथे त्यांच्या खतना ( circumcision ) करून त्यांचे धर्मांतर करण्यात येई. कडक शिस्तीत त्यांना टर्किश भाषा, लष्करी आणि प्रशासकीय प्रशिक्षण दिले जाई. स्वतःच्या कुटुंब, समुदाय आणि संस्कृतीपासून पूर्णपणे तोडलेल्या या मुलांस त्यांची पलटण ( corps ) हीच ओळख,  भावसंबंध आणि कुटुंब  असे. या सैनिकांना लग्नसंबंध, कुटुंबनिर्मितीचे अधिकार नसत. हे विशेष दल सर्व सैनिकी कारवायात निपुण असे, कडक शिस्तीत वाढलेल्या या दलावर फक्त सुलतानाची मालकी आणि अंकुश असे. या पलटणींच्या बळावरच ओटोमान साम्राज्य विस्तारले, १२५८ साली झालेल्या मंगोल आक्रमणास थोपवून धरू शकले. परंतु कालान्तराने  या पद्धतीत शिथिलता आली. जानिसारानी लग्न करायला,  संसार थाटायला सुरुवात केली. आधीची कडक शिस्त जाउन सैन्यभरतीत भाऊबंदकी आली. या भाऊबंदकीमुळे सैन्याच्या कामात ढिलाई आली, संरक्षण सोडून हे निमसत्ताधारी  फक्त महसूलवसुलीतच आपली मर्दुमकी दाखवू लागले . अठराव्या शतकापासून ते पहिल्या महायुद्धापर्यंत या भाऊबंदकीने ओटोमान साम्राज्य पोखरून काढले. महाकाय असे हे साम्राज्य दिसायला प्रचंड पण बाह्य आक्रमणापासून स्वतःला वाचवण्यात असमर्थ आणि त्याचबरोबर अंतर्गत पातळीवर स्थैर्य आणि नियंत्रण घालवलेले असे खोकले बनले. याचवेळी वाढणाऱ्या पाश्चिमात्य देशांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. या सर्व ताकदीना त्यांच्या सीमांवर असलेल्या या साम्राज्याच्या विघटना पासून धोका होता कारण ओटोमान विघटन म्हणजे युरोपीय सत्तांचे विस्तारीकरणास वाव. परंतु यामुळे युरोपीय देशांमधली विस्ताराची स्पर्धा वाढून त्यापैकी सफल होणाऱ्यांचे सामर्थ्य वाढले असते, युरोपमधील सत्ताकारणाचे संतुलन बिघडले असते.  या कारणामुळे खेकडेन्याय पद्धतीने कोणीही या खिळखिळीत साम्राज्याचा  स्वतःच्या विस्तारासाठी फायदा करून घेतला नाही. उलट वेळोवेळी ओटोमान साम्राज्याने केलेल्या सारवासारवीच्या सुधार प्रक्रियेस त्यानी पाठींबा आणि सक्रिय सहाय्य केले. 

एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच ओटोमान साम्राज्याचे तुकडे पडणे सुरु झाले. १८०४ ते १८५० पर्यंत सर्बियन क्रांती सुरु होती याचा परिणाम म्हणजे इतर बाल्किक प्रदेशातही अशांतता पसरली. राष्ट्रीयत्वाचे हे लोण पुढे अरब प्रदेशात पोहोचले. १८३० साली ग्रीस युरोपिअन सत्तांच्या पाठिंब्यामुळे स्वतंत्र झाला. १८३१ -३३ दरम्यान मुहम्मद अली या पूर्वाश्रमीच्या निष्ठावंत माल्मुक सैनिकाने इजिप्त येथे आपली सत्ता स्थापन करून ओटोमान  साम्राज्यावरच हल्ला चढवला. सिरीयाचा बराचसा भाग त्याने यावेळी गिळन्कृत  केला. हे उठाव आणि स्वाऱ्या १८४० मध्ये लंडन येथे झालेल्या परिषदेनंतर थंडावल्या. या परिषदेत ओटोमान साम्राज्याच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणार्थ युरोपीय सत्ता मदत करतील असे ठरले. युरोपियांच्या उपरतीचे कारण आधी म्हटल्याप्रमाणे एकमेकांवर कुरघोडी हाच होता. ओटोमान साम्राज्याच्या सीमा अबाधित राखण्यात त्यांचा स्वार्थ होता. या परिषदेमुळे सिरीयाचा काही भाग मुहम्मद अली परत करतो आणि इजिप्तचा तो पहिला राजा म्हणून राज्य सुरु करतो पण त्याचवेळी तो ओटोमान साम्राज्याच्या सार्वभौमित्वाशी एकनिष्ठताही मान्य करतो. यानंतर १८५४ -५६ साली झालेल्या क्रिमिअन युद्धात ओटोमान साम्राज्य ब्रिटन आणि फ्रान्सच्या बरोबर रशियाशी लढते. हे युध्द जरी ते जिंकले तरी ओटोमान साम्राज्याची अधोगती काही थांबत नाही. तुर्कस्तान मध्ये याचे तीव्र पडसाद उठतात आणि सुधाराची प्रक्रिया सुरु होते  १८७७ -७८ सालपर्यंत चाललेल्या टर्किश -रशियन युद्धापर्यंत ही अधोगती चालूच राहते. त्याचवेळेस  पूर्व प्रांतातले  बल्गेरिया, रोमानिया आणि सर्बिया स्वतंत्र होतात तर त्यापाठोपाठ बोस्निया - हर्झगोवानिया ऑस्ट्रियाच्या अधिपत्याखाली येते. हे बाल्कन प्रदेश एकजूट करून १९१२- १३ साली ओटोमान साम्राज्यावर हल्ला चढवतात. 

मुहम्मद अलीच्या नेतृत्वाखाली इजिप्त हे अधिक स्वायत्त बनत जाते आणि ओटोमान सुलतानाच्या सार्वभौमत्वाला फक्त नाममात्र मान्यता देते.  त्याला लागून असलेला अल्जेरिया हा १८३० पासून फ्रान्सच्या संरक्षणात आलेला होत. थोड्याच कालावधीत मोरोक्को आणि ट्युनिशिया हे प्रदेशही फ्रान्सचे अधिपत्य मान्य करतात. अर्थातच बुडणाऱ्या या महासत्तेला टिकून राहण्यासाठी  बदलत्या परिस्थितीचा विचार करावाच लागतो. जपानमध्ये १८५०-६८ असा सुधारणांचा काळ होता, १८५६ मध्ये क्रिमियन युद्धानंतर रशियातही ही प्रक्रिया सुरु होते. इजिप्तमध्ये मोहम्मद अलीने सत्ता स्थापना करतानाच लष्करी आणि प्रशासकीय सुधारणा सुरु केल्या होत्या. या रेट्यामध्ये ओटोमान सुलतानही लष्करी सुधार सुरु करतो. याकामी युरोपिअन प्रशिक्षणाची मदत घेतली जाते. लष्करी सुधारणान्बरोबरच मुलभूत सेवा सुविधा, पोस्ट, दळणवळण, लष्करी साहित्य बनवणारे कारखाने आदींची स्थापना होते. अर्थातच या सुधाराच्याप्रक्रीयेला फळे लागायला बराच वेळ लागला आणि ओटोमान साम्राज्याला तसा त्याचा फायदा झालाच नाही. परंतु पहिल्या महायुद्धांनंतर दोस्त राष्ट्रांचा पाडाव करून तुर्कस्तान स्वतन्त्र करण्यात तुर्की  स्वातंत्र्यवीरांना या आधुनिक लष्कराचा फायदा नक्कीच झाला. पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी ओटोमान साम्राज्य जिंकून त्याचे आपसात विभाजन केले होते. १९१९ ते २३ दरम्यान टर्किश स्वातंत्र्ययुद्ध झाले आणि १९२३ मध्ये तुर्कस्तान हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला.  

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग ५ तुर्कस्तान - मध्य आशियायी देश . प्रास्ताविक


तुर्कस्तान - मध्य आशियायी देश . प्रास्ताविक 


अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात बलाढ्य मुस्लिम साम्राज्याला  वाढत्या युरोपिअन शक्तींकडून जबरदस्त  लष्करी आव्हान मिळाले. चार-पाचशे वर्षांपासून संथ आणि सुरक्षित अशा ओटोमान साम्राज्याला या परिस्थितीला तोंड देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी या बदलाचा प्रतिकार करण्याऐवजी त्याबरोबर जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. आपल्या लष्कराची बांधणी त्यानी युरोपीय लष्कराच्या धर्तीवर सुरु केली. याकामी फ्रेंच व जर्मन सैन्याचे अनुकरण त्यानी केले, या सत्तांपासून त्यानी लष्करी सामग्री विकत घेणे सुरु केले. अर्थातच या कामी जास्त खर्च होऊ लाग्ल. हा खर्च भागवण्यासाठी जास्त महसूल गोळा करणे त्यांना आवश्यक होते. त्यामुळे प्रशासकीय आणि त्याबरोबरच अर्थव्यवस्थेत बदल अनिवार्य झाले. अधिक खर्च भागवण्यासाठी अधिक महसूल, अधिक महसुलासाठी  उत्पादकतेत वाढ आणि त्यासाठी अर्थव्यवस्थेचे पुनर्रचनाकरण असा हा बदल सुरु झाला. साहजिकच याचे जीवनाच्या इतर क्षेत्रात पडसाद उमटले. ओटोमान साम्राज्यात सुरु झालेल्या तन्झीमात या सुधार चळवळीची ही पार्श्वभूमी होती. परंतु ही सुधाराची चळवळ अनेक नवीन प्रश्नांची उकल जुन्या सामाजिक, विधी आणि राजकीय आराखड्यातच करत होती. परिणामी या सुधारणांचा वेग अतिशय धीमा होता.युरोपीय सत्तांवर त्याचे परावलंबन होते आणि नव्या पिढीला ही गती मान्य नव्हती. मुस्तफा केमाल या मिलिटरी अधिकारयाच्या नेतृत्वात नवीन राजकीय सुधार ओटोमान साम्राज्यातून विकसित अशा आजच्या तुर्कस्तानने केले. आधी उल्लेखलेल्या प्रमाणे पाश्चिमात्यांच्या लष्करी, राजकीय आणि आर्थिक अशा सर्वच बाबीत तुर्कस्तानने अनुकरणाची भूमिका घेतली. फ्रेंच राज्यघटनेवर आधारित अशा धर्मनिरपेक्ष आणि औद्योगिक राष्ट्राची निर्मिती हे या नवीन बदलांचे उद्दिष्ट होते. हा बदल अर्थातच सोपा नव्हता कारण आधीच्या ओटोमान साम्राज्यातील विविध व्यवस्था, संस्था आणि औद्योगीकरणाच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या आधुनिक युरोपमधील समाजरचना यात खूप तफावत होती. या कारणामुळेच तुर्कस्तानला सर्व बदल आत्मसात करायला एका शतकाचा काळ लागला. आणि या तफावतीमुळेच कदाचित अनुकरणाचा हा मार्ग इतर राष्ट्रांनी स्वीकारलेला दिसत नाही. तुर्कस्तान यात यशस्वी झाला याचे महत्वाचे कारण म्हणजे बदल आणणाऱ्या राज्यकर्त्यांकडे असणारी जुन्या  ओटोमान साम्राज्याची  प्रचंड लष्करी व प्रशासकीय ताकद,  त्यांना मिळालेले लष्करी विजय आणि त्यावर आधारित केमालला मिळालेला लोकप्रिय पाठींबा.  ओटोमान साम्राज्याचाच भाग असणारे आणि तुर्कस्तानशी भाषिक आणि वांशिक साम्य असणाऱ्या मध्य आशियायी देशांनीही १९९१ मध्ये रशियाच्या विघटनानंतर तुर्कस्तानच्या राज्यघटनेशी साधर्म्य असणाऱ्या  राज्यघटना स्वीकारल्या . यात या देशातील ऐतिहासिक घटक  आणि अर्थातच साम्यवादी सोवियत संघाच्या धोरणाचा प्रभाव दिसून येतो. ओटोमान साम्राज्य १५व्या शतकापासून जरी तुर्कस्तानमध्ये स्थिरावले तरी त्याचा उगम आणि प्रवास या मध्य आशियायी देशातून झाला होता. ऑटोमन  साम्राज्यातील लष्करी आणि प्रशासकीय सेवांमध्ये इथले लोक नेहमीच अग्रगण्य होते. पुढे सोविएत संघाच्या अधिपत्याखाली जरी हा भूभाग गेला तरी लोकांचे आपापसातील संबंध दृढ राहिले. १९१८ पासून पुढची ७० वर्षे हा भूभाग सोवियेत संघाच्या अधार्मिक आणि साम्यवादी व्यवस्थांमध्ये राहिला. सोवियेत संघाच्या आर्थिक रचनेत मध्य आशियायी देशांची मोठी भूमिका होती आणि त्यांना याएकसंघीकरणाचा फायदाही झाला. शतकानुशतके असलेली अस्थिरता जाउन अंतर्गत बाजारपेठा निर्माण झाल्या. सोविएत व्यवस्थांमध्ये लोकांच्या गरजा भागून आर्थिक व सामाजिक स्थैर्य आले. सोवियेत विघटनात बाल्टिक राष्ट्रांचा विद्रोह ही प्रमुख घटना होती. परंतु या मध्य आशियायी देशांमध्ये अजूनही सोविएत काल हा स्थैर्य आणि सुबत्तेचा काळ मानला जातो. विघटनानंतर आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ही राष्ट्रे जरी स्वायत्त झाली होती तरी त्यांच्या क्षमता मात्र नगण्य होत्या. उदा उझबेकिस्तानच्या कापसाला सोविएतची आयती बाजारपेठ नव्हती. वर्षानुवर्षे एकाच पठडीचे उत्पादन, सेवा व्यवस्था असल्यामुळे  या राष्ट्रांची नव्या स्पर्धात्मक वातावरणात उभे राहण्याची ताकद नव्हती. साम्यवादी व्यवस्थेत  समाजाचे राजकीय शिक्षण आणि सहभाग हा साम्यवादाच्या बसलेल्या घडीत, वाट्याला आलेले शासनप्रणीत सह्रभागीकरन एवढेच होते. सोवियेत संघात सामील होण्यापूर्वीची या भागातील प्रगतीही निम्नच होती. सोविएत वसाहतवादाच्या कचाट्यात या भूभागात आमुलाग्र बदल झाले, व्यवस्था बदलल्या, समाज बदलला. परंतु हे सारे बदल व्यवस्थेने लादलेले बदल होते. स्वाभाविक विकासाच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले नव्हते, सततच्या दिशादर्शनाची सवय असलेल्याया समाजापुढे स्वातंत्र्यामुळे अस्तित्व व अस्मिता या दोन्ही पातळ्यांवर एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती.  

ओटोमान साम्राज्याच्या सीमा आणि मध्य आशियायी देशांचे भौगोलिक स्थान दर्शवणारे नकाशे. 
Inline image 1



Inline image 2

नव्या वैश्विक रचनेत त्यांना स्वतःची ओळख बसवण्यात साहजिकच जुन्या धार्मिक आणि सांस्कृतिक बाधांवर आधारित जुने ओटोमान/ टर्किश संबंध आणि तिथल्या व्यवस्था जवळच्या वाटल्या. या राष्ट्रांनी जरी  मुस्लिम अस्मितेस अंगीकारलेले असले तरी सोविएत संघाच्या अखत्यारीत इथल्या सर्व समाजव्यवस्थांची पायाभरणी ही धर्मनिरपेक्ष तत्वांवर झाली आहे. हा  एक वेगळा घटक इथे लक्षात घ्यायला हवा. या राष्ट्रांनी स्वातंत्र्यानंतर अंगिकारलेल्या कायदे व राज्यशासनव्यवस्था व प्रशासकीय व्यवस्था या इथे प्रचलित साम्यवादी ढाच्यातूनच विकसित झाल्या आहेत. या राज्यांच्या राज्यघटनावर दृष्टिक्षेप टाकला असता काही टर्किश राज्यघटना आणि या देशांच्या राज्यघटना यात बरेच साम्य आढळून येते. उदाहरणादाखल या राष्ट्रांच्या राज्यघटनेतील प्रमुख  तरतुदी पुढे नमूद केल्या आहेत. हे विस्ताराने यासाठी दिले आहे कि इतर मुस्लिम राष्ट्रे आणि तुर्कस्तान आणि मध्य आशियायी देशांच्या धोरणात मुलभूत फरक आहे आणि तो त्यांच्या राज्यघटनातून प्रतीत होतो. 

·     टर्किश राज्यघटना - हे प्रजासत्ताक, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, कायद्याने बंधित व शासित, सार्वजनिक शांतता, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक  न्याय, मानवी अधिकारांचा आदर आणि अतातुर्कने घालून दिलेल्या राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेस बांधील असे राज्य आहे.
·     किरगीझ राज्यघटना - किरगीझ हे सार्वभौम, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, सामाजिक आणि संघटीत  , कायद्याने शासित असे राज्य 
·     कझाकिस्तान  राज्यघटना - लोकशाही, धर्मनिरपेक्ष, कायद्याने बंधित असे सामाजिक राज्य जिथे व्यक्ती, तिचे आयुष्य, अधिकार आणि स्वातंत्र्य हे सर्वोच्च आहे. 
·     तुर्कमेनिस्तान - लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि कायद्याचे राज्य 
·     ताजिकिस्तान - सार्वभौम, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, संघटीत आणि  कायद्याचे राज्य 
·     उझबेकिस्तान -सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक जिथे शासन हे लोकांच्या इच्छा आकांक्षा चे प्रतिनिधित्व करेल आणि त्यांच्या हितांना कारक असे राज्य करेल. लोक हेच शासनाच्या सत्तेचा स्त्रोत आहेत. 
·     अझरबैजान - कायद्यावर आधारित, धर्मनिरपेक्ष राज्याची बांधणी हेच शासनाचे काम आहे. 


तुर्कस्तान आणि या देशांच्या राज्यघटनेत आणि कायदेसंहितांमध्ये कुठेही इस्लाम किंवा इस्लामिक कायद्यांचा उल्लेख नाही. राष्ट्रबांधणी आधुनिक कायद्याच्या, काळानुसार येणाऱ्या अर्थ व समाजरचनेच्या आधारवर इथे केली गेली आहे. मुस्तफा केमालने घालून दिलेली सुधाराची आणि देशप्रेमी राष्ट्रीयत्वाची अत्यंत मजबूत अशी घडीसही आज वैचारिक आव्हान दिले जात आहे आणि हे इथे असलेल्या, रुजलेल्या लोकशाही प्रक्रियेचे प्रतीकच आहे. एकूणच मुस्लिम जगतात आणि इतर प्रगत जगतात तुर्कस्तानचा त्याच्या आर्थिक प्रदार्शनच्या जोरावर बोलबाला आहे. खालील आलेख पहिला तर १९६६० ते ९० पर्यंत आर्थिक प्रगती स्थिरावलेली दिसते. परंतु १९९० नंतर दरडोई उत्पन्न तिप्पटीने  वाढलेले दिसते. 
 Inline image 3



याच काळात सध्या निवडून आलेल्या AKP पक्षाचा प्रभावही वाढलेला दिसतो. AKP हा धार्मिक पक्ष म्हणून ओळखण्यात येत असला तरी हा पक्ष स्वताला conservative म्हणवतो , इस्लामिक नाही .  १९९० पासून आर्थिक उदारीकरण, उद्योगधंद्याच्या वाढीवर भर आणि आधीच्या केमाली राष्ट्रीयीकरणाची आर्थिक धोरणे बदलून आयातीस प्रोत्साहन देणाऱ्या नव्या धोरणांचा पुरस्कार तुर्कस्तानने केलेल्या आर्थिक प्रगतीमागे दिसून येतो. या घडामोडीत सुरुवातीची समाजवादी अर्थरचना बदलून नव्याने येणाऱ्या सामाजिक बदलांमुळे पुन्हा पुरातनप्रेमी असा विचार वाढीस लागला आहे . एका बाजूला आर्थिक प्रगती तर सामाजिक, राजकीयदृष्ट्या प्रतिगामी अशा सामाजिक वातावरणाचे पडसाद गेल्या काही वर्षात तुर्कस्तान मध्ये वाढत आहेत. भारतात गेल्या वीस वर्षात  उदारीकरणानंतर झालेला भाजपचा प्रभावी विस्तार आणि इथल्या नवश्रीमंत आणि उच्चवर्गीय समाजामध्ये अशा पक्षांच्या रूढीवादी सामाजिक विचारसरणीस  मिळणारा प्रतिसाद याच्याशी तुर्कस्तानातील वातावरण मिळते जुळते आहे. आजचा तुर्कस्तान समजायचा असेल तर ऑटोमन साम्राज्याबद्दल जाणणे महत्वाचे आहे. पुढील लेखात याबद्दल माहिती दिली आहे. 



आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...